बारामती : ‘ज्येष्ठ नेते शरद पवार जो काही निर्णय घेतात किंवा मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच करतात. पक्षाबाबतचा जो काही निर्णय असेल, तो शेवटच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच घेतला जाईल. तोवर कोणताही निर्णय होणार नाही,’ अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भात बारामती येथे माध्यमांशी बोलताना दिली. ‘अजित पवार आणि मी जन्मापासून एकत्रच आहोत,’ असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील, अशी चर्चा सातत्याने होत आहे. त्यातच ‘पांडुरंगाची इच्छा असेल तर, आषाढी एकादशीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे भाऊ-बहीण एकत्र येतील,’ अशी अपेक्षा आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली होती. यासंदर्भात सुळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नासंदर्भात त्या म्हणाल्या, ‘राहुल गांधी यांनी निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाला तसे पत्र दिले आहे. त्यावर निवडणूक आयोगाकडून अद्याप त्यांना कोणतेही उत्तर आले नाही. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लेखही पाहिला आहे. ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये राहुल गांधी आणि देवेंद्र फडणवीस यांना मत मांडण्याचा अधिकार आहे.’