लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मुंबई ते बेंगळुरू या १४ पदरी महामार्गाचे काम सहा महिन्यांत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या महामार्गामुळे वाहने पुणे शहरात न येता शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याचा दावाही त्यांनी केला.

सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात गडकरी बोलत होते. राज्यात सार्वजनिक बांधकाममंत्री असताना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग पुढील पन्नास वर्षांचा विचार करून बांधण्यात आला होता. मात्र आता हा महामार्ग अपुरा पडत आहे. त्यामुळे अटल सेतूपासून बेंगळुरूपर्यंत नवा महामार्ग करण्यात येणार आहे. या महामार्गाची निविदा काढण्यात आली आहे. १४ पदरी असलेल्या या महामार्गाचे काम सहा महिन्यांत सुरू केले जाणार आहे. हा महामार्ग पुण्याच्या वर्तुळाकार मार्गिकेला जोडला जाणार आहे. त्यामुळे वाहने शहरात न येता बाहेरूनच जाणार असल्याने शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. तसेच हाच मार्ग छत्रपती संभाजीनगर रस्त्यालाही जोडला जाणार आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.

आणखी वाचा-घातक लेझर झोतांचा वापर आणि ध्वनीवर्धकांवरील कारवाईकडे लक्ष, विसर्जन मिरवणुकीत सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त

देशात अजिबात पैशाची कमी नाही. मात्र, इमानदारीने काम करणाऱ्यांची कमी आहे. विमा, पेन्शन आणि बाँड या व्यवस्थेत खूप मोठी क्षमता असल्याचे गडकरी यांनी नमूद केले.

सरकारी अधिकाऱ्यांवर सडकून टीका

गडकरी यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. समाजात जातींमध्ये वाद असतात तसे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये तुकडीचे वाद असतात. प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) चुकीच्या पद्धतीने केले जातात. त्यामुळे प्रचंड अपघात होतात, लाखो लोक जखमी होतात. प्रशासनात दिवट्यांचे बाप आहेत. फाईलवर जेवढे वजन टाकाल, तेवढ्या पटापट कामे होतात. अधिकाऱ्यांचे पत्नीपेक्षा फाइलवर अधिक प्रेम असते. म्हणून ते तीन-तीन महिने काहीही न करता फाइल स्वत: जवळ ठेवतात, असे गडकरी म्हणाले.

आणखी वाचा-कांदा, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, फ्लॉवर महाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी असेपर्यंत देशात विनाचालक वाहने नाहीत

देशातील २२ लाख लोक वाहनचालक आहेत. विनाचालक वाहनांमुळे या लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. त्यांच्या नोकऱ्या गेल्या तर मोठाच प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे मी असेपर्यंत या देशात विनाचालक वाहने येणार नाहीत, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.