कामगार चळवळ आणि पुरमोगामी विचारांवर आघात करणारी प्रवृत्ती सध्या सत्तेत आहे. जुन्या कामगार नेत्यांमुळे कामगार संघटना बळकट आहेत. मात्र आता खूप संघटना नाहीत. कामगार संघटना मजबूत होऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक व्यासपीठ असले पाहिजे असे आत्ताच्या राज्यकर्त्यांना वाटत नाही. त्याचमुळे कामगारांच्या समस्या वाढल्या आहेत असा दावा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केला. तळेगाव या ठिकाणी कामगार नेते शरद राव यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.

नक्षल चळवळीशी संबंधित अटकसत्र हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे त्याबाबत आत्ता काही बोलणे योग्य ठरणार नाही. मात्र जे कोणी सरकार बदलण्याची भाषा करत असेल आणि त्यांना नक्षली ठरवले जात असेल तर ते योग्य नाही असे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी म्हटले आहे. विचारधारा मान्य नसेल तर जनता सरकार बदलू शकते. तो अधिकार त्यांना लोकशाहीने दिला आहे असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

कामगारांवर चिडले शरद पवार

दरम्यान पुण्याच्या तळेगाव येथील कामगार नेते शरद राव यांच्या अर्ध पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कामगारांना पुरते वैतागले. मंचावर स्वागत करायला येणाऱ्या उत्साही कार्यकर्त्यांना अक्षरशः शरद पवारांनी खाली उतरवलं, मंचावर आणि समोर विनाकारण उभे असणाऱ्यांना बाजूला केलं तर गोंधळ घालणाऱ्यांना शांत केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून म्युन्सिपल मजदूर युनियन आणि म्युन्सिपल इंजिनियर्स असोसिएशनच्या सदस्यांनी गोंधळ सुरु केला. सभागृह छोटं असल्याने इतर तीन ठिकाणी स्क्रीन लावण्यात आले. मात्र पवारांचं स्वागत करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी एकच गर्दी केली. पवारांनी ही गर्दी सुरुवातीलाच हटवली, मात्र मंचावरचा कामगार वर्ग काही हलला नाही. पण ते स्क्रीन समोरच उभे असल्याने मग पवारांनी त्यांना ही खाली उतरवलं.

स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याने शरद पवार वैतागले