पुणे : ‘कौटुंबिक हिंसाचार, पहलगामसारखे दहशतवादी हल्ले अशा सांस्कृतिक ऱ्हासाच्या घडामोडी घडत असताना केवळ शब्दांचे फुलोरे फुलवणारे लेखन पुरेसे ठरणारे नाही. बालवयातच संवेदनशील मने घडतील, अशा स्वरूपाच्या बालसाहित्याची निर्मिती व्हावी,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि बालसाहित्यकार डॉ. न. म. जोशी यांनी शनिवारी व्यक्त केली.

अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने आयोजित बालवाङ्मय पुरस्कार वितरण कार्यक्रमात जोशी बोलत होते. प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारुहास पंडित, ज्येष्ठ लेखिका डाॅ. मंदा खांडगे, संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे, सल्लागार डॉ. संगीता बर्वे आणि विश्वस्त शिरीष चिटणीस या वेळी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंडित म्हणाले, ‘इंग्रजीचे अतिक्रमण होत असतानाही मराठीमध्ये निष्ठेने आणि पाय रोवून होत असलेली बालसाहित्याची निर्मिती निश्चितच कौतुकास्पद आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात मराठी शाळा मराठी भाषेच्या अनुषंगाने अनेक स्तुत्य प्रयोगशील उपक्रम राबवित आहेत. या उपक्रमशीलतेच्या माध्यमातून एक प्रकारे राष्ट्राची पायाभरणीच केली जात आहे. तांत्रिक साधनांनी समृद्ध असलेल्या सध्याच्या बालकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधणे आवश्यक आहे.’ विजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले, मृणाल जैन यांनी आभार मानले.