नगर जिल्हा हा दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करण्याची गरज नाही. तर, जवखेडा येथे झालेल्या दलित हत्याकांडातील दोषी गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करण्यावर सरकारचा भर राहणार असल्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे आणि दिलीप कांबळे यांनी रविवारी पाथर्डी तालुक्यातील जवखेडा येथे दलित अत्याचारामध्ये बळी पडलेल्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. भाजपतर्फे या कुटुंबाला पाच लाख रुपयांचा धनादेश, तर खासदार दिलीप गांधी यांच्यातर्फे एक लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
दलित अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असल्याने नगरला दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. यासंदर्भात विचारले असता दिलीप कांबळे यांनी दलित अत्याचारग्रस्त जिल्हा जाहीर करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. या घटनेतील गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यामध्ये दलित, आदिवासी यांच्यासह कोणावरही अन्याय-अत्याचार होऊ नयेत यासाठी सरकार कटिबद्ध राहणार आहे, असेही ते म्हणाले.
जवखेडा हत्याकांडाचा तपास शेवटच्या टप्प्यावर आहे. अद्याप गुन्हेगारांना अटक झालेली नाही. त्यामुळे याविषयीची अधिक माहिती उघड करता येत नसल्याचे दिलीप कांबळे यांनी सांगितले. हा खटला द्रुतगती न्यायालयामध्ये चालविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिलीप कांबळे यांचे जल्लोषात स्वागत!
राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच पुण्यात आलेल्या दिलीप कांबळे यांनी भाजप शहर कार्यालयास भेट दिली. शहराध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते दिलीप कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. आमदार मेधा कुलकर्णी, संदीप खर्डेकर, प्रा. श्रीपाद ढेकणे, श्याम सातपुते, दिलीप उंबरकर या वेळी उपस्थित होते. शहर कार्यालयाबाहेर बँजो लावून आणि फटाके वाजवून दिलीप कांबळे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.