पुणे : घाऊक बाजारात आवक कमी झाल्याने कांदा, बटाटा, आले, मटार, तोतापुरी कैरीच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दिवाळीनंतर फळभाज्यांची पुरेशी तोडणी न झाल्याने सध्या बाजारात फळभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे.
गुलटेकडीतील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशातून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, इंदूर येथून २ टेम्पो गाजर, कर्नाटकातून ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ५ टेम्पो शेवगा, तामिळनाडूतून २०० ते २५० प्लास्टिक जाळी (क्रेट्स) तोतापुरी कैरी, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, कर्नाटकातून २ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून ८ ते १० टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून ४०० ते ४५० गोणी सातारी आले, भेंडी ५ टेम्पो, गवार ३ टेम्पो, टोमॅटो ८ हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, गाजर ५ टेम्पो, कोबी ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, भुईमूग शेंग ५० ते ६० गोणी, मटार ४०० ते ४५० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा ६० ट्रक अशी आवक झाली, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ३० टेम्पो अशी आवक झाली.
पालेभाज्यांच्या दरात घट
गेल्या काही दिवसांपासून तेजीत असलेल्या पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे. कोथिंबिरेसह सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात घट झाली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबीर एक लाख ५० हजार जुडी, तसेच मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली होती.
पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) – कोथिंबीर – ५०० ते १२००, मेथी – १५०० ते २०००, शेपू – ५०० ते १०००, कांदापात – ५०० ते १५००, चाकवत – ५०० ते १०००, करडई- ५०० ते १०००, पुदिना – ५०० ते ६००, अंबाडी – ५०० ते ८००, मुळे – १००० ते १५००, राजगिरा – ४०० ते ७००, चुका- ५०० ते १०००, चवळई – ५०० ते १०००, पालक – १००० ते १५००
कलिंगड, पपई, खरबूजच्या दरात घट
मागणीच्या तुलनेत आवक चांगली झाल्याने कलिंगड, पपई, खरबूजच्या दरात घट झाली. मागणी वाढल्याने डाळिंबाच्या दरात वाढ झाली. चिकू, अननस, माेसंबी, संत्री, पेरू, लिंबांचे दर स्थिर आहेत.
रविवारी फळबाजारात मोसंबी ६० ते ७० टन, संत्री २० ते २५ टन, डाळिंब ७० ते ८० टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबे दोन ते अडीच हजार गोणी, कलिंगड १५ ते २० टेम्पो, खरबूज ४ ते ५ टेम्पो, चिकू ५०० खोकी, अननस २ ट्रक, बोरे १०० गोणी, सीताफळ २० ते २२ टन अशी आवक झाली.
