पिंपरी : ‘औद्योगिक क्षेत्रातील तक्रारींचे निवारण करण्याकरिता स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असून, खंडणी, माथाडी संदर्भात कोणी त्रास दिल्यास उद्योजकांनी निर्भयपणे पुढे तक्रार करावी. तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल. औद्योगिक क्षेत्रातील वातावरण भयमुक्त ठेवण्यासाठी पोलीस उद्योजकांच्या पाठीशी उभे आहेत,’ अशी ग्वाही पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी उद्योजकांना दिली.
तळेगाव एमआयडीसीतील जेसीबी इंडिया कंपनीच्या सभागृहात आयुक्त चौबे यांनी उद्योजकांशी संवाद साधला. औद्योगिक सुरक्षा, वाहतूक कोंडीसह त्यांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्यांचा आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर, औद्योगिक तक्रार निवारण कक्षाचे प्रमुख सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव, एमआयडीसीचे सहायक अभियंता राजेश धोत्रे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता जयप्रकाश सगरे, सहायक अभियंता प्रशांत पवार या वेळी उपस्थित होते.
आयुक्त चौबे म्हणाले, ‘औद्योगिक क्षेत्रातील तक्रारींचे निवारण करण्याकरिता स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. औद्योगिक कंपन्यांना कंत्राटांसाठी दमदाटी, खंडणी, दहशत माजविल्यास तक्रार करावी. महिलांविषयी काही समस्या उद्भवल्यास, कोणतीही भीती न बाळगता थेट पोलिसांशी संपर्क साधावा. अशा सर्व तक्रारींवर तत्काळ कारवाई करण्यात येईल.
‘अंतर्गत सुरक्षेसोबतच कंपन्यांनी सभोवतालचा सार्वजनिक परिसर आणि रस्त्यांवरदेखील ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवावेत. कामगारहिताच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने कंपन्यांनी नावीन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करून दुचाकीस्वार कर्मचारी, कामगारांनी हेल्मेट वापरावे, याबाबत पुढाकार घ्यावा. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पायाभूत सुविधा गरजेच्या आहेत. सुविधा निर्माण होईपर्यंत तात्पुरत्या उपाययोजनांवर भर दिला जावा,’ अशा सूचनाही चौबे यांनी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
कामाच्या वेळांमध्ये बदल करा
वाहतूककोंडी आणि रहदारीवरील ताण कमी करण्यासाठी कंपन्यांनी समन्वयाने कामांच्या वेळांमध्ये बदल करावेत. माल घेऊन येणारी अवजड वाहने रस्त्यावर उभी राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी. वाहनतळाची व्यवस्था करावी, असे आवाहनही त्यांनी उद्योजकांना केले.