पुणे : मुंबई, नागपूरसह राज्यातील विविध शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत आहे. पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातही संध्याकाळनंतर आणि पहाटे, सकाळी थंडी वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. रात्री तसेच पहाटेच्या वेळी वाढत असलेल्या थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर्स, जार्किंग, शाल, कानटोपी यांचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे.

थंडीपासून संरक्षण करण्यासाठी पुणेकर नागरिक आवश्यक त्या उपाययोजना करत आहेत. शहरात वाढत असलेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले तसेच निवासी परिसरांमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षा कर्मचारी थंडीपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर शेकोट्या पेटवतात. काही भागात नागरिक लाकूड, कचरा किंवा कोळसा देखील जाळतात. या सर्व प्रकारामुळे तयार होणा‌ऱ्या धुरांमुळे पुणे शहरातील हवा प्रदूषण वाढत आहे.

जागोजागी पेटविल्या जात असलेल्या शेकोट्यामुळे केवळ हवा प्रदूषण होत नाही तर वातावरणामध्ये बदल होतात. तसेच याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होतो. शेकोट्या पेटवल्यामुळे धूर, कार्बन मोनोऑक्साइड यासह अन्य हानिकारक वायूंचे उत्सर्जन होऊन त्याचा श्वसनावर गंभीर परिणाम होतो. यामुळे दमा, अस्थमा आणि इतर श्वसन रोगांचा धोका देखील वाढत असल्याचे वारंवार समोर आले आहे.

या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर हवेचे प्रदूषण थांबविल्याबरोबरच विविध आजारांना शेकोट्या कारणीभूत ठरतात. त्यामुळे शहरात कोणत्याही भागात आणि परिसरात शेकोट्या पेटविण्यावर महापालिकेने निर्बंध घातले आहेत. शहरात शेकोट्या पेटवताना आढळल्यास संबंधित व्यक्तींच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पुणे महापालिकेने दिला आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबतचे आदेश काढले असून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

पुणे शहरातील सोसायटीच्या परिस्रात किंवा रस्त्यावर शेकोटी पेटवून उघड्यावर कोळसा, जैविक पदार्थ (बायोमास), प्लास्टिक, रबर आणि इतर कचरा जाळून धूर निर्माण केला आणि कोणत्याही गृहनिर्माण संकुलातील सुरक्षारक्षक, सफाई कामगार आणि इतर कामगार व्यक्ती, महापालिका कर्मचारी किंवा कंत्राटी कामगार याबरोबरच महापालिका ठेकेदाराकडील नियुक्त कंत्राटी कामगार या नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ही दंडात्मक कारवाई केली जाईल, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

कायदा काय सांगतो?

शहरातील हवा गुणवत्तेत सुधारणा करणेसाठी केंद्र तसेच राज्य शासनाने हवा प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी विविध कायदे आणि नियम बनवले आहेत. जसे कि “हवा (प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, १९८१” अंतर्गत भाग ४ कलम १९ (५), आणि “घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६” कलम १५ (छ) तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांचेकडील राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमची दि. २५/८/२०२२ रोजीची मार्गदर्शक तत्वे यानुसार उघड्यावर कोळसा, जैविक पदार्थ (बायोमास), प्लास्टिक, रबर आणि इतर कचरा जाळण्यास मनाई करण्यात आली आहे.