मुंबईत ‘इंडिया’ या देशभरातील विरोधी पक्षांच्या आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी या बैठकीला बोलावलंच गेलं नसल्याचं म्हटलं. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमचे वकील असल्याचं म्हटलं. ते बुधवारी (३० ऑगस्ट) भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी आयोगाच्या सुनावणीनंतर पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आम्ही अजूनही शिवसेनेबरोबर आहोत. आता आम्हाला ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण का दिलं नाही याबाबत माध्यमांनी काँग्रेसला प्रश्न विचारणं अधिक योग्य होईल. २०१९ मध्येही आम्ही काँग्रेसला ऑफर दिली होती. याहीवेळी आम्ही त्यांना ऑफर दिली आहे. परंतु काँग्रेसच आम्हाला आघाडीबाबत निमंत्रण देत नसल्यामुळे आम्ही त्या आघाडीत नाही.”

“उद्धव ठाकरे हे आमचे वकील आहेत”

“आम्ही उद्धव ठाकरेंना आमचे वकील म्हणून लढा असं सांगितलं आहे. उद्धव ठाकरे हे आमचे वकील आहेत. त्यांनी आमची बाजू इंडिया आघाडीच्या बैठकीत मांडावी. मला बैठकीला बोलावत नाहीत हे उद्धव ठाकरेंना माहिती आहे. काँग्रेस आम्हाला दूर का ठेवतं आहे ते माध्यमांनी काँग्रेसला विचारावं. ज्या दिवशी काँग्रेसवाले मला माहिती देतील तेव्हा मी त्यांना आम्हाला का दूर ठेवता हे विचारेन,” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

“राजू शेट्टी यांनी आधी बैठकीला बोलावलं आहे की नाही हे सांगावं”

राजू शेट्टी यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं म्हटलं. त्याबाबत विचारलं असता प्रकाश आंबेडकर म्हणाले, “राजू शेट्टी यांनी जाणार नाही हे सांगण्याआधी त्यांना बैठकीला बोलावलं आहे की नाही हे आधी सांगावं.”

हेही वाचा : भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी सुनावणी, देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आजच्या बैठकीत शिवसेना आमच्या बाजूने बॅटिंग करेल”

“आम्ही जसं म्हणतो की, आम्हाला बोलावलेलं नाही, म्हणून आम्ही जात नाही. तसं राजू शेट्टींनीही खुलासा करावा की, त्यांना निमंत्रण आलं आहे की नाही. तसेच निमंत्रण आलं असेल, तर ते ठोकारलं आहे का? आजच्या बैठकीत शिवसेना आमच्या बाजूने बॅटिंग करेल, असं आम्ही गृहित धरतो,” असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.