पिंपरी : उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात जनसंवाद घेतला. नागरिकांचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी विविध प्रश्नांवर माध्यमांशी संवाद साधला. आगामी महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष स्वबळावर लढणार की महायुतीत यावरही भाष्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना शहरात चांगली कामे केली. त्यामुळे पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन करून अजित पवार म्हणाले, ‘महाविकास आघाडीत एकत्र काम करत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी असावी असा प्रयत्न त्याकाळी करत होतो. आता आम्ही महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती असावी आमची अपेक्षा आहे.’

विरोधी पक्षनेताही मीच ठरवायचो

माझ्या नेतृत्वाखाली सहकाऱ्यांनी १९९२ पासून २०१७ पर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिकेत चांगले काम केले. त्यावेळी अनेक वर्षे विरोधी पक्षनेता कोण असावा, हे देखील मीच ठरवत होतो. विरोधकांना विश्वासात घेऊन निर्णय घेत होतो. खेळीमेळीच्या वातावरणात महापालिकेचे कामकाज केले. टोकाचे मतभेद निर्माण होऊ दिले नाहीत. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची देखील कामे केली आहेत.’हिंजवडीतील कामांना गती दिली आहे. बेशिस्त अवजड वाहनांवर कारवाईच्या सूचना दिल्या जातील, असे पवार यांनी सांगितले.

‘भामा आसखेड, आंध्र धरणातील पाणी आरक्षित केले. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प नियोजित केले. शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प सुरू करून पाणी आणावे लागणार आहे,’असेही ते म्हणाले.

महापालिकेने विविध कामासाठी कर्जरोखे उभारले आहे. महापालिकेला कर्जबाजारी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे याची वस्तुस्थिती तपासण्याची सूचना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘पवार कुटुंबाची यंदा दिवाळी नाही’

पवार कुटुंबात दुःखद घटना घडली आहे. राज्यातील अनेक भागात पूर परिस्थितीमुळे मोठे नैसर्गिक संकट आले आहे. त्यामुळे यंदा पवार कुटुंबाचा दिवाळीतील पाडवा एकत्रित साजरा होणार नाही.

महापालिका निवडणुकीनंतर नवीन आयुक्त

महापालिकेचे आयुक्त असलेले शेखर सिंह यांची राज्य शासनाने बदली केली. त्यांच्याकडे नाशिक कुंभमेळ्याची जबाबदारी दिली आहे. महापालिकेचे आयुक्त म्हणून काम केलेले महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. महापालिका निवडणूक होईपर्यंत त्यांच्याकडेच पदभार राहील. निवडणूक झाल्यानंतर महापालिकेला नवीन आयुक्त दिला जाईल, असेही पवार यांनी सांगितले.