पुणे : शहरातील प्रश्नांसाठी भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांपासून राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार आणि राज्यसभा खासदारांपर्यंत अनेकजण पुणे महापालिकेत अधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठका घेत असूनही रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा अशा कोणत्याच समस्येवर समाधानकारक उत्तर ना प्रशासनाला शोधता आले आहे, ना पुढाऱ्यांना. प्रशासन सत्ताधाऱ्यांनाच जुमानत नसेल, तर तेथे आमची काय दशा, असा प्रश्न आता सामान्य पुणेकरांना पडला आहे. विरोधकांनी यानिमित्ताने भाजपवर निशाणा साधला असून, नागरिकांच्या प्रश्नांची इतकीच काळजी असती, तर भाजप नेत्यांना वारंवार बैठका घेण्याची वेळ आली नसती, अशी टीका केली आहे.

‘शहरातील नागरिकांच्या प्रश्नांची सत्ताधारी म्हणून किती जाण आहे, हे केवळ दाखविण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षणमंंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि राज्यसभेच्या सदस्य खासदार मेधा कुलकर्णी महापालिकेत येऊन बैठका घेऊन सूचना देतात. मात्र, प्रत्यक्षात पुणेकरांच्या समस्या सुटतच नाहीत,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.

ते म्हणाले, ‘गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. तरीही, शहरातील नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा महापालिकेवर अंकुश नाही. शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, पावसाळ्यात तुंबणारी गटारे, रस्त्यांवर लागणारे कचऱ्याचे ढीग अशा प्रश्नांवर महापालिकेत केंद्रीय मंत्र्यांपासून राज्यातील मंत्र्यांना बैठका घ्याव्या लागतात. या बैठकीत हे नेते प्रशासनाला सूचना देतात. मात्र त्यानंतरही परिस्थिती जैसे थे राहते, हे शहरातील भाजपच्या नेत्यांचे अपयश आहे.’

‘पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठका घेत असल्याचे भाजपच्या शहरातील नेत्यांकडून दाखविले जाते. प्रत्यक्षात स्वत:ची खासगी कामे करून घेतली जातात,’ अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली.

‘भाजप नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रश्नांची इतकीच काळजी असती, तर वारंवार भाजप नेत्यांना बैठका घेण्याची वेळ आली नसती. नागरिकांच्या कामासाठी त्यांनी बैठका घेतल्या असत्या, तर पावसाळ्यात रस्त्यांची, पावसाळी गटारांची अशी अवस्था झाली नसती. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम करणारे मुरलीधर मोहोळ यांनी पीएमपीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस का आणल्या नाहीत, केंद्रातून शहरासाठी त्यांनी किती निधी आणला,’ असा सवाल त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारवाईचे काय झाले?

पावसाळा सुरू होण्यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेत येऊन पालिका प्रशासनाची बैठक घेतली. त्या वेळी, रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्यास, तसेच घरांमध्ये पाणी शिरल्यास संबधित अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर शहरात झालेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचून राहिले. पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. रस्त्यांवर खड्डे पडले, डांबर वाहून गेले. मात्र, कोणावर जबाबदारी निश्चित होऊन कारवाई झाली, याचे उत्तर अजून मिळालेले नाही.