पुणे : ‘पुण्यात अश्मयुग, राष्ट्रकूट, सातवाहन काळातील शिल्पांपासून छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे यांच्या काळातील संस्कृतीचा ठेवा आहे. मात्र, त्याकडे आपले लक्ष नसून आपण त्यांची ओळख हरवत चाललो आहोत,’ अशी खंत इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर यांनी व्यक्त केली.

प्रसाद प्रकाशनातर्फे ११ पुस्तकांचे आणि अनाहत प्रकाशनातर्फे सात, अशा एकूण १८ विविध पुस्तकांचे प्रकाशन शनिवारी झाले. त्या वेळी प्रा. घाणेकर बोलत होते. गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डाॅ. मुकुंद दातार यांच्या हस्ते कै. मनोहर बापूसाहेब जोशी स्मृती गौरव पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री डाॅ. अरुणा ढेरे यांना, तर ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांना कै. मंजिरी मनोहर जोशी स्मृती गौरव पुरस्कार या वेळी प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त राजेश पांडे आणि प्रसाद प्रकाशनाच्या संपादक डाॅ. उमा बोडस हे या वेळी उपस्थित होते.

प्रा. घाणेकर म्हणाले, ‘पुण्यात ६५ पेक्षा जास्त संग्रहालये, ५० पेक्षा अधिक शतायुषी संस्था, ज्या देव-देवतांची संपूर्ण भारतात, महाराष्ट्रात मंदिरे नाहीत अशी मंदिरे आहेत. शहरात २२५ हून अधिक उद्याने आहेत. लष्करी आस्थापनांसह निसर्गरम्य ठिकाणेही पुण्यात सर्वाधिक आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासकही पुण्यातच आहेत.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्ञानाचा वारसा टिकविण्याची गरज

‘जगातील प्रत्येक देशात वेगवेगळी संस्कृती असून त्यांचे फक्त अवशेष उरले आहेत. मात्र, भारत असा एकमेव देश आहे, ज्या देशात हजारो वर्षांच्या परंपरेचे दाखले, साहित्य असे संस्कृतीचे मोठे आभाळ अस्तित्वात आहे. ही संस्कृती अद्याप टिकून आहे. माणसे आणि माणसांचे कल्याण ही कल्पना साहित्यातून उलगडून पाहिली जात असून, अशी भारतीय संस्कृती, वारसा टिकवून पुढे घेऊन जाणे ही काळाची गरज आहे,’ असे मत डाॅ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.