पुणे : जिल्ह्यातील कळमोडी, चासकमान, वडिवळे, भाटघर आणि नाझरे ही पाच धरणे शंभर टक्के भरली आहेत. भीमा खोऱ्यांतर्गत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नदीपात्रातील विसर्गामुळे सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरणही शंभर टक्के भरले आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणीसाठ्यातही वाढ होत असल्याने साखळी प्रकल्पातील चारही धरणांमध्ये २६.६१ अब्ज घनफूट एवढा पाणीसाठा जमा झाला असून, धरणे ९१.९७ टक्के भरली आहेत.
दरम्यान, नीरा आणि भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू झाला असल्याने नदीकाठच्या रहिवाशांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. भीमा खोऱ्यांतर्गत जिल्ह्यात २६ धरणे आहेत. त्यांपैकी भाटघर, चासकमान, वडिवळे, नीरा-देवघर, कळमोडी, आंद्रा या धरणांतून अनुक्रमे नीरा आणि भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणे शंभर टक्के भरल्याने आणि पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात येवा येण्याचे प्रमाण वाढत असल्याने पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी चासकमान धरणातून सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता १ हजार ५०० क्युसेक विसर्ग भीमा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. तर भाटघर धरणाच्या विद्युतनिर्मिती केंद्राद्वारे १ हजार ६३१ क्युसेक, धरणाच्या अस्वयंचलित द्वारांद्वारे ७ हजार क्युसेक असा एकूण ८ हजार ६३१ क्युसेक विसर्ग सुरू असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण आणि येवा यानुसार विसर्ग कमी-अधिक केला जाणार आहे. नीरा-देवधर धरणाच्या सांडव्यातून ९ हजार ५२० क्युसेक वेगाने नीरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. तर, वीर धरणातून २२ हजार ६३५ क्युसेक एवढा विसर्ग सुरू आहे. डिंभे, विसापूर, भामा-आसखेड, पवना, कासारसाई, टेमघर, वरसगाव, पानशेत, नीरा-देवधर, वीर ही धरणे १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये २६.८१ टीएमसी एवढा पाणीसाठा झाल्याने पुणेकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. या चारही धरणांमध्ये मिळून ९१.९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. पानशेत धरणातून मुठा नदीपात्रात सांडव्याद्वारे १ हजार २४२ क्युसेक आणि विद्युतनिर्मिती केंद्राद्वारे ६०० क्युसेक असा एकूण १ हजार ८४२ क्युसेक विसर्ग सुरू आहे.
गेल्या दीड महिन्यापासून या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १६, पानशेत येथे ५९, वरसगाव येथे ५४ आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
उजनी धरण शंभर टक्के भरले
जून आणि जुलै महिन्यात खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात आल्याने सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. उजनी धरण शंभर टक्के भरले आहे.
खडकवासला साखळी प्रकल्पातील पाणीसाठा
- टेमघर- ३.५७ टीएमसी
- वरसगाव- १२.०५ टीएमसी
- पानशेत- १०.१० टीएमसी
- खडकवासला- १.०८ टीएमसी