उरुळी देवाची आणि फुरुसुंगी येथील कचरा डेपोला मागील आठवड्यात आग लागण्याची घटना घडली होती. त्यामुळे ग्रामस्थांनी येथे कचरा टाकण्यास तीव्र विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक आणि ग्रामस्थांची बैठक झाली. मात्र ती बैठक निष्फळ ठरली असून ग्रामस्थांचा कचरा टाकण्यास विरोध कायम आहे. शहरातील विविध कचरा प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र काही प्रकल्प बंद अवस्थेत आहे. ते पूर्ण क्षमतेने चालू करण्याचे प्रशासनाला आदेश देण्यात आल्याची माहिती टिळक यांनी दिली. लवकरच पालकमंत्री गिरीश बापट आणि जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतरे यांच्या सोबत बैठक घेतली जाईल आणि कचरा प्रश्न मिटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्या पुढे म्हणाल्या की, शहरातील महापालिकेचे बंद असलेलं प्रकल्प मे अखेर सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहे. तसेच कचरा लिफ्टिंगसाठी गाड्या कमी पडत असल्याने गाड्याच्या दुरुस्ती आणि बदलीसाठी आवश्यक त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. एक हजार टन कचऱ्याची विल्हेवाट करणारे प्रकल्प शेतकरी, बायोगॅस प्रकल्प पूर्ण क्षमतेने राबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यानी सांगितले. पुणे शहरात दररोज १४०० टन इतका कचरा निर्माण होतो. त्यावर उरुळी देवाची आणि फुरुसुंगी येथील कचरा डेपोत सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. तर ओल्या कचऱ्यावर शहरातील विविध प्रकल्पांमध्ये प्रक्रिया केली जाते.

कचरा डेपो प्रश्नी १५ मे ला एनजीटी सुनावणी

उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपो प्रश्नाची आज एनजीटी समोर सुनावणी होती. मात्र या सुनावणीला महापालिकेचा एक ही आधिकारी उपस्थित न राहिल्याने ही सुनावणी आता १५ मे ला घेणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.  या वेळी विरोधी पक्ष नेते चेतन तुपे म्हणाले की, आज कचरा प्रश्नावर एनजीटी मधे तारीख होती परंतु महापालिकेचा एकही अधिकारी गेला नाही. यावरूनच प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना कचरा प्रश्नाचे गांभीर्य नाही असेच दिसून येते. जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे टिळक यांनी म्हटले आहे.