पुणे : जिल्ह्यात पाच दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन हजारांपेक्षा जास्त कुटुंबांना त्याचा फटका बसला आहे. तर, पावसाने सहा ते सात जणांचा बळी घेतला असून, अतिवृष्टीमुळे पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावातील पंचनामे सुरू करण्यात आले असून, येत्या दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर बाधितांना तातडीने मदत करण्यात येणार आहे.
इंदापूर, दौंड आणि बारामती या तालक्यांत पाच दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पाऊस झाला. या तिन्ही तालुक्यांतील अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसला. पावसामुळे शेतशिवारांमध्ये पाणी साचले. शेतातील चिखलामुळे काढणीला आलेल्या विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्यही वाहून गेले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टी झालेल्या गावातील पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील नुकसानाची माहिती दिली.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील तीन हजार कुटुंबे बाधित झाली आहेत. पुण्यासह खेड, शिरूर येथे विविध कारणांमुळे सहा ते सात जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. पावसामुळे शेती आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे येत्या दोन दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर बाधित क्षेत्राची संख्या निश्चित होईल. त्यानंतर बाधित नागरिक आणि शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून तातडीने मदत पोहोचविली जाईल, असे डुडी यांनी सांगितले.
दरम्यान, ‘अतिवृष्टीग्रस्तांना मदत म्हणून पाच हजार रुपये नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. मात्र, पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनंतर ही रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाधितांना दहा हजार रुपये देण्यात येतील. याबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मदतीसोबत बाधित कुटुंबीयांना दोन महिने अन्नधान्य आणि शिधा पुरविण्यात येणार आहे,’ असेही डुडी यांनी स्पष्ट केले.