पुणे: पुणे शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील आज बहुतांश भागात शाळांना सुटी देण्यात आली आहे. प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासनासह महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील यंत्रणा मध्यरात्री पासूनच कार्यान्वित झाली आहे.
सोलापूर रस्ता, लोणी काळभोर , कदम वाक वस्ती येथे मुसळधार पावसाने घरे, वाहने पाण्याखाली गेली आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. इंदापूर, खेड, मावळ, मुळशी या तालुक्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
धायरी, वडगाव बुद्रुक, खडकवासला यासह पानशेत या भागांमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे येथील रस्त्यांवर पाणी साचले आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागातील वाहतूक देखील मंदावली आहे. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सोमवारी कार्यालयात जाताना नोकरदारांची चांगलीच तारांबळ उडाली.
मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. थेऊरमध्ये ५० घरांमध्ये पाणी शिरले असून घटनास्थळी एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे काम सुरु आहे. पुणे शहरातील धायरी भागात देखील पाणी शिरल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. त्याचे निवारण करून नागरिकांना मदत करण्यासाठी यंत्रणा घटनास्थळी पाठविण्यात आल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
खडकवासला धरणातून विसर्ग सुरु
मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यातून मुठा नदी पात्रात सकाळी आठ वाजता ४६९७ क्युसेक पाणी सोडले जात होते. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता यामध्ये वाढ करून १४ हजार ५४७ क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे. पुढील काही तासात होणाऱ्या पावसाचा अंदाज लक्षात घेऊन धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी-जास्त केला जाईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मुळा-मुठा नदी काठाच्या सर्व नागरिकांना महापालिका प्रशासनाकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.