‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा १९९० च्या घटनेवर आधारित आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असून हा सिनेमा अधिकाधिक नागरिकांनी पाहावा यासाठी पुण्यातील पाषाण येथील हॉटेल खान्देशचे मालक रवींद्र गरुड यांनी एक अनोखी सूट देऊ केलीय. जो ग्राहक ‘द काश्मीर फाईल्स’ पाहून येईल आणि त्याचे तिकीट दाखवेल त्याला हॉटेलमध्ये २० टक्के डिस्काउंट देण्याचा निर्णय गरुड यांनी घेतलाय. या अनोख्या उपक्रमाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचे पाहावयास मिळत आहे.
याबाबत रवींद्र गरुड यांना विचारले असता ते म्हणाले की, “मी ‘द कश्मीर फाईल्स’ या सिनेमा पाहिला असून हा सिनेमा १९९० च्या घटनेवर आधारित आहे. त्यावेळी नेमके काश्मीरमध्ये काय घडले होते हे चित्रपटात दाखवले गेले आहे. हा सिनेमा सर्वांना पाहिला पाहिजे. त्यासाठी मी आमच्या हॉटेलमध्ये येणार्या ग्राहकांनी सिनेमाचे तिकीट दाखविल्यास २० टक्के डिस्काउंट देण्याचा निर्णय घेतला आहे.
गरुड यांनी सुरु केलेल्या या अनोख्या ऑफरला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. काही शे नाही तर तब्बल दोन हजारांच्या आसपास आता ही संख्या पोहोचणार आहे. मागील दोन दिवसात एक हजार ९३० जणांनी याचा लाभ घेतला असल्याचे गरुड यांनी सांगितले. या हॉटेलमधील ऑफरचा फोटो तुफान व्हायरल झालाय, त्यामुळेच अनेकजण येथे येऊन तिकीटाच्या मोबदल्यात २० टक्के सूट मिळवतानाचं चित्र दिसत आहे.
नक्की वाचा >> The Kashmir Files च्या मुद्द्यावरुन नितेश राणेंना शिवसेनेच्या विनायक राऊतांचा पाठिंबा; म्हणाले, “हा चित्रपट…”
भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये करमुक्त झालेल्या ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या वादावर मंगळवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिप्पणी केली. ‘सातत्याने व्यक्तिस्वातंत्र्याचा झेंडा घेऊन उभी असलेली टोळी या चित्रपटाची बदनामी करत आहे’, असा आरोप मोदींनी केला.
नक्की वाचा >> विश्लेषण : चित्रपट टॅक्स फ्री होतो म्हणजे काय होतं? तिकिटांचे दर कमी होतात का?; फायदा कोणाला होतो?
काश्मीर खोऱ्यमतून १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या पलायनावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचा मुद्दा भाजपाच्या अजेंड्यावरही राहिलेला आहे. या चित्रपटावर काँग्रेसने तसेच, काही सिनेमा परीक्षकांनी प्रतिकुल मते व्यक्त केली आहेत. या विरोधाचा संदर्भ देत, मोदींनी मंगळवारी भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत या चित्रपटाचे समर्थन केले.‘हा चित्रपट काश्मिरी पंडितांबाबत कित्येक वर्षे जाणीपूर्वक दडवून ठेवलेले सत्य मांडतो. मात्र, या चित्रपटाची बदनामी केली जात आहे. एखाद्याला हा चित्रपट आवडला नसेल तर त्याला प्रत्युत्तर देणारा वा प्रतिवाद करणारा चित्रपट निर्माण करावा’, असे मत मोदी यांनी भाजपाच्या खासदारांसमोर मांडले.
नक्की वाचा >> “केंद्र सरकारने ‘द कश्मीर फाइल्स’वर बंदी घालावी, या चित्रपटामुळे…”; खासदाराने केली मागणी
कुठलाही सिनेमा चांगला की, वाईट याची नीट समीक्षा केली पाहिजे पण, त्याऐवजी या चित्रपटाविषयी शंका-कुशंका घेतल्या जात असून हे कट-कारस्थान आहे. कुठल्याही विषयावर योग्य मार्गाने सत्याची मांडणी झाली पाहिजे. त्यामुळे चिंता फक्त या चित्रपटाबद्दल नाही. देशाच्या भल्यासाठी सत्य मांडले पाहिजे. संबधित विषयातील एक बाजू एखाद्याला महत्त्वाची वाटू शकते, दुसऱ्याला अन्य एखादी बाजू महत्त्वाची वाटेल. हा चित्रपटातून सत्य मांडले जात असेल तर त्याला विरोध कशासाठी केला जात आहे, असा सवाल मोदींनी केला.
नक्की वाचा >> “मी ‘गुजरात फाइल्स’ बनवायला तयार, सत्य मांडणार पण तुम्ही आश्वासन द्या की…”; दिग्दर्शकाची मोदींकडे मागणी
पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांना आर्थिक व लष्करी मदत पुरवली गेली. दहशतवाद्यांनी अनेक काश्मिरी पंडितांची हत्या केली. या हत्यासत्रानंतर काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून पलायन करावे लागले होते. विस्थापित झालेले काश्मिरी पंडित अजूनही खोऱ्यात परत येऊ शकलेले नाहीत. हे सत्य ज्यांना दडपून टाकायचे आहे, तेच या चित्रपटाला विरोध करत आहेत, असे मोदी म्हणाले.