पुणे : टाळ-मृदंगांचा गजर आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शहरातील संस्था-संघटनांकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. खांद्यावर भगवी पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पंढरीची वाट चालणाऱ्या हजारो वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यासह विविध ठिकाणी जनजागृती करणारे उपक्रम राबविण्यात आले.
‘समर्थ युवा फाउंडेशन’ आणि ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’ (एमएनजीएल) यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी ‘आरोग्यवारी’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, ‘एमएनजीएल’चे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर, ‘फ्लीटगार्ड फिल्टर्स’चे अध्यक्ष संजय कुलकर्णी, वाणिज्य संचालक शंकर करजगी, संचालक बागेश्री मंठाळकर या वेळी उपस्थित होत्या.
‘अक्षर दिंडी’च्या वतीने बोरूच्या सहायाने ‘पसायदान’ साकारत सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्यात आला. योगेश ओगले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘अक्षर दिंडी’तून सामाजिक समतेचे संदेश देणारे अभंग, ओवी यांच्यासह पाणी-वीज बचत, संविधान जागृती, आरोग्य भान, पर्यावरण संवर्धन, इत्यादी विषयांवर जनजागृती करण्यात आली.विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या वारकऱ्यांना ‘जगद्गुरू संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
कुसुम बलभीम डमाल, भरत रामचंद्र गायकवाड, हभप संतोष रुद्रया स्वामी, हभप रवि वसंत जावीर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर विनायक साळुंके यांचा मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. साळुंके यांच्या पत्नी सुलोचना साळुंके यांनी हा पुरस्कार स्वीकारला. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष उमेश महाराज मोरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी ननगरसेवक सनी निम्हण, सुनीता वाडेकर, समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, सचिव दीपक म्हस्के या वेळी उपस्थित होते.त्यानंतर निसर्ग उपचार केंद्र पुणे आणि समितीच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत ‘मालिश सेवा’ उपक्रमही राबविण्यात आला.