पुणे : जाधववाडी हा द्वारविरहीत तलाव ९५ टक्क्यांपर्यंत भरला असून सद्यस्थितीचा पाऊस आणि धरणातील येवा वाढल्यामुळे सुधा नदी (इंद्रायणी नदी) पात्रात कोणत्याही क्षणी जाधववाडी तलावातून अनियंत्रित विसर्ग चालू होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे मौजे जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, देहू – आळंदी ते तुळापूर पर्यंतच्या सर्व नदीकाठच्या गावांना नदीपात्रालगत जाऊ नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

विशेषतः पायी दिंडी सोहळ्याच्या अनुषंगाने देहू आळंदी येथे आलेल्या वारक- यांनी नदीपात्रामध्ये न जाण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. तसेच संबंधित ग्रामपंचायत, नगर पालिका आणि महापालिका यांना इंद्रायणी नदी अनियंत्रित विसर्गाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खडकवासल्यातून दुपारी विसर्ग

खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून आज दुपारी एक वाजता २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे. यासंदर्भातही सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी नागरिकांना सुरक्षिततेबाबत सूचना द्याव्यात त्याचप्रमाणे पी ए सिस्टम द्वारे नागरिकांना सुचित करण्यात यावे असेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकल्पातील चारही धरणात आजमितीस ६.४० अब्ज घनफूट ( टीएमसी) एवढा पाणीसाठा आहे.