पुणे : धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात पाणी शिरलेल्या नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावरील एकतानगरी येथे पुन्हा पाणी घुसू नये, यासाठी येथील नदीकाठी सीमाभिंत बांधण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे. ही सीमाभिंत बांधण्यासाठी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे ३०० कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे. सीमाभिंतीचा आता विचार होत असल्याने एकतानगरीच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागे पडला आहे.

पावसाळ्यात धरणे भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात नदीत विसर्ग सोडला जातो. याचा पहिला फटका सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी परिसराला बसतो. पूर्वी ग्रामपंचायतीच्या परवानगीने येथे इमारती उभारल्या आहेत. नदीत ३५ हजार क्युसेक पाणी आल्यानंतर निळ्या पूररेषेत असलेल्या एकतानगरीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात होेते. गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि मध्यरात्री अचानक धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने एकता नगरीमधील नागरिकांचा जीव धोक्यात आला होता.

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने एकता नगरीचे पूरापासून संरक्षण करण्यासाठी नदीकाठी सीमाभिंत बांधण्याचा पर्याय पुढे आणला आहे. महापालिकेने यापूर्वी कामगार पुतळा, मंगळवार पेठ झोपडपट्टी, पाटील इस्टेट झोपडपट्टी, विश्रांतवाडी येथील शांतीनगर झोपडपट्टी येथे नदीकाठी संरक्षक भिंती उभारून पुराचा धोका कमी केला आहे. या धर्तीवरच एकतानगरी येथे भिंत उभारण्यासाठी आराखडा तयार केला असून यासाठी ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकतानगरी येथील पुराचा धोका कमी करण्यासाठी नदीकाठावर सीमाभिंत उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यासाठी तीनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापनाला पत्र पाठविण्यात आले आहे.- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त महापालिका आयुक्त