पुणे : खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या परिसरात पाऊस कायम असला तरी, त्याचा जोर ओसरला आहे. या चारही धरणांमध्ये मिळून आजमितीस ९.२५ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा असून, या पाणीसाठ्यात गेल्या २४ तासांमध्ये ०.५७ टीएमसी एवढी वाढ झाली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांतून पुणे शहराला पाणीपुरवठा केला जातो.
गेल्या दोन दिवसांपासून या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे गुरुवारी (१९ जून) खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्गाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र, गेल्या २४ तासांत पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम राहिला असला तरी, त्याचा जोर फारसा नसल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३२ मिलिमीटर, पानशेत आणि वरसगाव धरण परिसरात अनुक्रमे २५ आणि २६ मिलिमीटर तर खडकवासला धरणांमध्ये ०२ मिलिमीटर पावसाची नोंद जलसंपदा विभागाकडून करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून विसर्गही टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला.त्यानुसार गुरुवारी रात्री सुरू असलेला पंधरा हजार क्युसेक विसर्ग शुक्रवारी सकाळी ११ हजार ९२४ क्युसेक तर सायंकाळी सातनंतर ४ हजार ५६५ क्युसेक असा करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.या चारही धरणांमध्ये मिळून ९.२५ टीएमसी एवढा पाणीसाठा असून, टेमघरमध्ये ०.५ टीएमसी, पानशेमध्ये २.८१ टीएमसी, वरसगावमध्ये ४.६१ तर खडकवासला धरणामध्ये १.३३ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.