निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराच्या पाठिशी मतदारांबरोबर पैसा आणि बळ आवश्यक असते, हा समज आता राजकीय पक्ष आणि उमेदवारांमध्ये दृढ झाला आहे. मात्र, पैशाच्या जोरावर काहीही करता येते, हा उमेदवारांचा भ्रम अनेकदा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला की, दूर होतो; पण ऐनवेळी गरज पडली तर दम देऊन मतदारांवर दबाव आणण्यासाठी बळाच्या वापरावर उमेदवारांचा विश्वास शेवटपर्यंत असतो. त्यामुळे अशी माणसे राजकारणी हाताशी ठेवत असतात. पुण्यात एकेकाळी निवडणूक जिंंकायची असेल, तर एखाद्यातरी तालमीची साथ लागायची. तालमीतील पैलवान प्रचारात फिरवले की, उमेदवाराचा विजय निश्चित समजला जायचा. आता निवडणुकीच्या प्रचाराचा हा प्रवास गुन्हेगारी टोळ्यांपर्यंत पोहोचला आहे.

एकेकाळी पुण्यात तालमींचे आगर होते. एखाद्या तालमीचा पाठिंबा मिळाला की, त्या उमेदवाराच्या विजयाची औपचारिकता बाकी राहायची. पैलवान प्रचारामध्ये फिरले की, मतदारांवर दबाव यायचा. त्यामुळे पैलवान हाताशी ठेवण्यावर राजकारण्यांचा भर असायचा. प्रत्येक उमेदवार हा कोणत्या ना कोणत्या तालमीचा पाठिंबा मिळविण्यासाठी धडपड करायचा. त्यामध्ये यश आले की, निवडणुकीची निम्मी लढाई जिंकल्यासारखे समजले जात असे. उमेदवाराला कोणत्या तालमीचा पाठिंबा आहे, याचाही प्रचार केला जायचा. पुणे ही नगरपालिका असल्यापासून हा प्रकार सुरू होता. मात्र, कालांतराने पुण्यातील काही तालमी ओस पडू लागल्या आणि प्रचारात पैलवानही कमी दिसू लागले.

हेही वाचा : महायुतीची डोकेदुखी रिपाइं वाढणार ! खासदार रामदास आठवले यांच्याकडून रिपाइं पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न

पुण्यात एकेकाळी ठिकठिकाणी तालमी होत्या. अनेक मल्ल घडविण्याचे काम या तालमींनी केले आहे. त्यादृष्टीने पुणे हे तालमींचेही आगर होते. गुरुजी तालीम, चिंचेची तालीम, बनकर तालीम, निंबाळकर तालीम, साखळीपीर तालीम, गुलसे तालीम, जगोबादादा तालीम, सुभेदार तालीम, नगरकर तालीम, खालकर तालीम, लोखंडे तालीम, गोकुळ वस्ताद तालीम, कुंजीर तालीम, काशीगीर तालीम, पापा वस्ताद तालीम, मोहनलाल वस्ताद तालीम, वीराची तालीम, शिवराम दादा तालीम, डोके तालीम, जोत्याची तालीम, पटवेकरी तालीम, फणी आळी तालीम आदी तालमींतून घडलेल्या कुस्तीगिरांनी देशात नाव कमावले होते.

पूर्वी या तालमींपैकी काही तालमींतील पैलवानांचा वापर उमेदवाराच्या प्रचारासाठी केला जात असे. मात्र, आता त्या पैलवानांची जागा सराईत गुन्हेगारी टोळ्यांनी घेतलेली दिसते. निवडणुका जवळ आल्या की, आता गुन्हेगारी टोळ्यांना हाताशी धरले जाऊ लागले आहे. मतदारसंघात एखादा सराईत गुन्हेगार असेल, तर त्याचा वापर केला जाऊ लागला आहे. निवडणुकीच्या काळात गुन्हेगार त्यांच्या भागामध्ये प्रचाराच्या काळात फिरू लागले की, त्यांचा मतदारांवर दबाब येत राहतो. त्याचा फायदा घेण्याचा उमेदवारांचा प्रयत्न असतो. झोपडपट्टी असलेल्या मतदार संघांमध्ये अशा गुन्हेगारांचा निवडणुकीच्या काळात सर्रास वापर होताना दिसतो. मात्र, मतदारांवर दबाव न येता भयमुक्त वातारवणात निवडणुका होण्यासाठी पोलिसांकडून गुन्हेगारांविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. सध्या विधानसभा निवडणकीच्यानिमित्ताने पुणे जिल्ह्यातील साडेसात हजार सराईत गुन्हेगारांविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांना नोटिसा पाठविण्याचे सरकारी सोपस्कार पोलिसांकडून पूर्ण करण्यात आले आहेत. मात्र, स्थानिक राजकारण्यांशी जवळीक साधून असलेले गुन्हेगार हे प्रचाराच्या काळात सक्रिय असतात. त्यांच्यामार्फत मतदानासाठी दबावतंत्राचा अवलंब करण्यात येतो. मतदारांनी विरोध केल्यास त्यांना मारहाणीचे प्रकारही या सराईत गुन्हेगारांकडून करण्यात येतात. साम, दाम आणि दंड या नीतीचा अवलंब करण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवारांना सराईत गुन्हेगार हे आधार वाटत असल्याची सद्यास्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…!

निवडणुकीच्या प्रचाराचा प्रवास हा तालमींपासून आता गुन्हेगारी टोळ्यांपर्यंत पोहोचला आहे. तालमींतील पैलवान हे दहशत निर्माण करण्यासाठी असायचे. आता सराईत गुन्हेगारांची दहशतच नव्हे, तर मतदारांच्या जीव घेण्यापर्यंत मजल पोहोचली आहे. त्यामुळे भयमुक्त वातावरणात निवडणुका घेण्याचे आव्हान दिवसेंदिवस उभे राहात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sujit. tambade@expressindia. com