खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या नऊ दिवसांपासून कोसळणारा दमदार पाऊस शनिवारी देखील कायम होता. गेल्या २४ तासांत चारही धरणांमध्ये तब्बल १.२४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत एकूण पाणीसाठा ६.९५ टीएमसी म्हणजेच २३.८३ टक्क्यांवर पोहोचला. पुढील पाच दिवस धरणक्षेत्रांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे धरणांमध्ये जुलैअखेरपर्यंत समाधानकारक पाणीसाठा जमा होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या धरणांमध्ये पाणीसाठा कमी –
शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. शुक्रवारी सायंकाळपर्यंत या चारही धरणांमध्ये शुक्रवारी सायंकाळपर्यंत ५.७१ टीएमसी म्हणजेच १९.५८ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी सायंकाळपर्यंत हा पाणीसाठा ६.९५ टीएमसीपर्यंत पोहोचला. गेल्या वर्षी ९ जुलैपर्यंत चारही धरणांमध्ये ८.६६ टीएमसी म्हणजेच २९.७० टक्के पाणीसाठा जमा झाला होता. सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये १.७१ टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. पुढील पाच दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात या काळात मुसळधार पाऊस पडून समाधानकारक पाणीसाठा जमा होईल, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत टेमघर धरण परिसरात ९० मिलिमीटर, वरसगाव धरणाच्या क्षेत्रात ७१ मि.मी., पानशेत धरण परिसरात ८० मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात आठ मि.मी. पावसाची नोंद झाली. शनिवारी दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात १०० मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात अनुक्रमे ८६ आणि ८५ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात २२ मि.मी. पाऊस पडला, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा टीएमसी आणि टक्क्यांमध्ये –
टेमघर – ०.४५ टीएमसी १२.१५ टक्के, वरसगाव – २.८० टीएमसी २१.८० टक्के, पानशेत – २.७४ टीएमसी, २५.७० टक्के, खडकवासला – ०.९६ टीएमसी ४८.८६ टक्के, एकूण – ६.९५ टीएमसी २३.८३ टक्के.