पुणे : बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये २०१६पासून समाविष्ट केलेल्या क्यूआर कोडचा नव्या एकात्मिक पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करण्यात आला नसल्याचे समोर आले आहे. क्यूआर कोड पाठ्यपुस्तकांकडून वगळण्याच्या या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. मात्र मराठीतून पुरेशा प्रमाणात आशय उपलब्ध नसल्याने क्यूआर कोड वगळण्यात आले असून, येत्या काळात बालभारती स्वत: आशयनिर्मिती करून पुन्हा क्यूआर कोड पुस्तकांमध्ये करण्याचे स्पष्टीकरण बालभारतीकडून देण्यात आले.

पाठ्यपुस्तकांकडून क्यूआर कोड वगळल्याबाबत शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. ‘२०१६ मध्ये मी बालभारतीला प्रस्ताव देऊन पुस्तकांत क्यूआर कोड समाविष्ट करण्याबाबत सुचवले होते. या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व पुस्तकांत हे कोड छापले होते. प्रत्येक धड्यासाठी डिजिटल आशय तयार करून तो क्यूआर कोडच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहचत होता. क्यूआर कोडचे तंत्र वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते. महाराष्ट्राच्या या उपक्रमाचे इतरही राज्यांनी अनुकरण केले. करोना काळात शाळा बंद असताना क्यूआर कोड असलेल्या पुस्तकांमुळे लाखो मुलांना शिक्षण घेणे सुलभ झाले. मात्र या वर्षीच्या पुस्तकातून क्यूआर कोड गायबच झाले आहेत. ज्या तंत्रामुळे मुलांचे शिक्षण अधिक रंजक झाले, तेच तंत्रज्ञान काढून टाकताना त्यापेक्षा अधिक चांगले पर्याय बालभारतीकडे आहेत का हा विचार व्हायला हवा, असे डिसले यांनी नमूद केले.

हेही वाचा >>>पावसाच्या अंदाजावर पाणी; राज्यात मोसमी वाऱ्यांचा प्रवास रखडला; २३ जूनपासून सक्रिय होण्याचा नवा अंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्यूआर कोड वगळण्याबाबत बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. पाटील म्हणाले, की क्यूआर कोड ही शिक्षणपूरक प्रणाली आहे. मात्र पाठ्यपुस्तकांतील पाठांसाठीचा आशय मराठीतून पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हता. त्यामुळे एकात्मिक पाठ्यपुस्तकांत क्यूआर कोड समाविष्ट केलेले नाहीत. येत्या काळात बालभारती स्वत:च प्रमाणित आशयनिर्मिती करून पुन्हा क्यूआर कोड समाविष्ट करेल.