पुणे : राज्यात १ जून ते २६ ऑगस्ट या काळात सरासरी ७७२.४ मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात ७०९.५ मिमी म्हणजे सरासरीपेक्षा आठ मिमी कमी पाऊस झाला आहे. विभागनिहाय विचार करता मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २१ टक्के कमी, मराठवाडय़ात सरासरीपेक्षा १८ टक्के कमी, विदर्भात सरासरीपेक्षा ९ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. सांगली आणि जालन्यात अत्यल्प पावसामुळे भीषण स्थिती निर्माण झाली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रात ५६० मिमी सरासरी पाऊस पडतो. प्रत्यक्षात २१ टक्के कमी ४४४.३ मिमी पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. नगरमध्ये ३४ टक्के, धुळय़ात २३ टक्के, जळगावात १४ टक्के, कोल्हापुरात १४ टक्के, नंदुरबारमध्ये २१ टक्के, नाशिकमध्ये ९ टक्के, पुण्यात १७ टक्के, सांगलीत ४५ टक्के, साताऱ्यात ३६ टक्के आणि सोलापुरात २७ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा >>>पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मृणाल गांजाळे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या मानकरी; राज्याला यंदा एकच पुरस्कार

मराठवाडय़ात सरासरीपेक्षा १८ टक्के कमी पाऊस झाला आहे. ४५१.७ सरासरी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ३७२.३ मिमी पाऊस झाला आहे. मराठवाडय़ातील नांदेड वगळता सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. औरंगाबादमध्ये ३३ टक्के, बीडमध्ये ३२ टक्के, हिंगोलीत ३४ टक्के, जालन्यात ४८ टक्के, लातूर ८ टक्के, उस्मानाबाद २३ टक्के आणि परभणीत २५ टक्के कमी पाऊस झाला आहे.
विदर्भात सरासरीपेक्षा नऊ टक्के कमी पाऊस झाला आहे. सरासरी ७३७ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ६७२.७ मिमी पाऊस झाला आहे. अकोल्यात ३० टक्के, अमरावतीत ३३ टक्के, बुलडाण्यात २२ टक्के, चंद्रपुरात ४ टक्के, गोंदियात १७ टक्के, नागपुरात ६ टक्के, वध्र्यात १० टक्के आणि वाशिम १७ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

सांगली, जालन्यातदुष्काळजन्य स्थिती

राज्यात सरासरी पेक्षा सर्वात कमी पावसाची नोंद सांगली आणि जालना जिल्ह्यात झाली आहे. या दोन्ही जिल्ह्यांत दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. सांगलीत सरासरी पेक्षा ४५ टक्के कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी ३३७.३ मिमी पाऊस होतो, प्रत्यक्षात १८५ मिमी पाऊस झाला आहे. जालन्यात सरासरी पेक्षा ४८ टक्के कमी पाऊस झाला आहे. ४२२ मिमी सरासरी पाऊस पडतो, प्रत्यक्षात २१९.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. जनावरांच्या चाऱ्याची, पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.

हेही वाचा >>>पुणे : कांदा, टोमॅटोसह बहुतांश फळभाज्यांच्या दरात घट, आवक वाढल्याने फळभाज्या स्वस्त

देशात सरासरीपेक्षा सात टक्के कमी पाऊस

एक जून ते २३ ऑगस्टपर्यंतच्या पावसाच्या आकडेवारीनुसार देशात सरासरीपेक्षा सात टक्के कमी पाऊस पडला आहे. या काळात देशात सरासरी ६४३ मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात ५९७.८ मिमी पाऊस पडला आहे. विभागनिहाय विचार करता ईशान्य भारतात सरासरीपेक्षा १९ टक्के कमी पाऊस पडला आहे. ईशान्य भारतात १००४.९ मिमी सरासरी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ८०९.८ मिमी पाऊस पडला आहे. उत्तर भारतात सरासरी पेक्षा आठ टक्के अधिक पाऊस आहे. ४४४ मिमी सरासरी पाऊस पडतो. प्रत्यक्षात ४७९.३ मिमी पाऊस पडला आहे. मध्य भारतात सरासरीपेक्षा चार टक्के कमी पाऊस पडला आहे. ७२९.८ मिमी सरासरी पाऊस पडतो. प्रत्यक्षात ६९९.३ मिमी पाऊस पडला आहे. दक्षिण भारतात सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस आहे ५१२.३ मिमी सरासरी पाऊस होतो, प्रत्यक्षात ४३७.२ मिमी पाऊस पडला आहे.

रत्नागिरी, मुंबईतही कमी पाऊस

धुवाधार पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकण किनारपट्टीवरही जेमतेमच पाऊस.झाला आहे. मुंबई शहरात सरासरी १६७५.२ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात सरासरी पेक्षा पाच टक्के कमी १५९९.४ मिमी पाऊस झाला आहे. रत्नागिरीत सरासरी पेक्षा सहा टक्के कमी पाऊस झाला आहे. सरासरी २६६२.५ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात २५१२.७ मिमी पाऊस झाला आहे. किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिणाम काय?

सांगली आणि जालना या दोन्ही जिल्ह्यांत दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. जनावरांच्या चाऱ्याची, पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.