पुणे : राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहे. इनहाऊस (संस्थांतर्गत) कोट्यातील जागांवर पूर्वीच्याच पद्धतीने प्रवेश देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांना दिले असून, या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक, संस्थाचालकांना दिलासा मिळणार आहे.
शिक्षण विभागाच्या कक्ष अधिकारी मृणाली काटेंगे यांनी परिपत्रकाद्वारे या बाबतचे निर्देेश दिले आहेत. शालेय शिक्षण विभागातर्फे २०२५-२६ पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहेत. त्याबाबत सुसूत्रता आणण्यासाठी ६ मे रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार इनहाऊस कोट्यातील प्रवेशांबाबत बदल करण्यात आला होता.
इनहाऊस कोट्यातील प्रवेशासाठी संस्थेची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय एकाच संकुलात असणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र या निर्णयाला संस्थाचालक, शिक्षक संघटना, पालक संघटनांनी तीव्र विरोध केला होता. त्यात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघ आदींचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर, ३० मे रोजी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह झालेल्या चर्चेनुसार शिक्षण आयुक्त (माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालकांनी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान आलेल्या अडचणींच्या अनुषंगाने इनहाऊस कोट्याबाबत असलेल्या तरतुदीत आवश्यक बदल करण्याची मागणी केली होती. संदर्भाधीन पत्राद्वारे शासनास विनंती केली. त्याबाबत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत इनहाऊस कोटा ग्राह्य धरताना शिक्षण आयुक्त प्रस्तावित केल्याप्रमाणे बदलास मान्यता देण्यात आली आहे.
इनहाऊस कोट्याअंतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित असतील.मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे येथे उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळांसाठी एक युनिट ग्राह्य धरणे योग्य राहील. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांकरीता त्याच संस्थेची शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसूली जिल्ह्यामध्ये एक युनिट इनहाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरणे योग्य राहील. या अनुषंगाने आवश्यक सूचना देण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता अकरावीच्या इनहाऊस कोट्यातील प्रवेश पूर्वीच्याच पद्धतीने होणार असल्याचे दिसून येत आहे.