पुणे : ‘मानवनिर्मित घटना असो की नैसर्गिक, अपवाद वगळता आजूबाजूच्या वातावरणात सकारात्मक असे काहीही घडत नाही. समाजात ऐकण्यासारख्या, बघण्यासारख्या चांगल्या गोष्टी दिसत नाहीत. सध्याची परिस्थिती जिवाला त्रास देणारी आहे,’ अशी खंत सामाजिक कार्यकर्त्या ममता सिंधूताई सपकाळ यांनी सोमवारी व्यक्त केली.

‘वसुंधरा फाउंडेशन’च्या वतीने सपकाळ यांच्या हस्ते ‘वसुंधरा गौरव’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष धनंजय भोसले, सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, आनंद सराफ, पीयुष शहा, गायक राजेश दातार, शाम भुर्के, माजी प्रशासकीय अधिकारी मोहन ठोंबरे, अभिजित पाठक, सुरेश काळे या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, योग अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रिया सावंत, शैलजा लोखंडे, स्नेहल जाधव, अजित माने, सुनील रोट्टी, मेधा जेरे, कौशल्य विकास, प्रसाद शिवरकर, सुनीता जाधव, विठ्ठल सूर्यवंशी आणि डॉ. दत्तात्रय शिंदे यांना ‘वसुंधरा गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अवधूत गांधी यांनी शिवगीते सादर केली.

सपकाळ म्हणाल्या, ‘वसुंधरा माणसाला सगळे काही देते. माणसाच्या सगळ्या गरजा निसर्ग भागवतो. आता पर्यावरणाची परिस्थिती गंभीर झाली आहे. माणसाला पोसणाऱ्या वसुंधरेचे संवर्धन करणे, ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी काम करायला हवे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पैसे कमावणे आणि समाजासाठी काम करणे या दोन्हींचा संगम साधता येतो. नोकरी करतानाही समाजासाठी योगदान देते येते. आपण करत असलेले कोणतेही काम उत्तमपणे करण्याने समाजात योगदान देता येते. समाधानाने आणि प्रेमाने केलेले काम सकारात्मकता देते,’ असे शाम भुर्के म्हणाले. मोनिका गोखले यांनी गणेश वंदना, तर ॲड. मनीषा भोसले यांनी कवितेचे सादरीकरण केले. शिल्पा देशपांडे आणि राज देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.