पुणे: ‘संतुलित आहाराकडे लोकांचा कल वाढत आहे. सध्या ‘डाएट’च्या वेगवेगळ्या प्रकारांना पेव फुटलेले दिसते. हे टाळा, ते टाळा असे सल्ले दिले जातात. मात्र, निरोगी आरोग्यासाठी पारंपारिक पद्धतीने बनविलेला आणि स्थानिक बाजारपेठेतील हंगामी खाद्यपदार्थांचा समावेश असलेला संतुलित आहार गरजेचा आहे. आहाराविषयी ‘कॉमन सेन्स’ जागृत ठेवा,’ असे मत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी बुधवारी व्यक्त केले.

‘पीएम. शहा फाऊंडेशन’तर्फे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात दिवेकर यांच्या ‘दि कॉमनसेन्स डाएट’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमात निवेदिका वसुंधरा काशीकर आणि फाऊंडेशनचे संचालक ॲड. चेतन गांधी यांनी दिवेकर यांच्याशी संवाद साधला. ‘ज्योतिचंद भाईचंद ज्वेलर्स’च्या मुकुलिका शहा, फाऊंडेशनच्या सरस्वती मेहता या वेळी उपस्थित होत्या.

दिवेकर म्हणाल्या, ‘पूर्णान्न समाजाला जाणाऱ्या भाताचा समावेश आहारात महत्त्वाचा आहे. देशी खाद्य पदार्थांचा आहारातील समावेश निरोगी आरोग्यासाठी गरजेचा आहे. नेहमी स्थानिक, त्या-त्या ऋतूत उपलब्ध असलेले आणि पारंपारिक खाद्यपदार्थ यांना आहारात प्राधान्य द्यायला हवे. आपल्याकडे पारंपरिक पदार्थाला ‘ट्विस्ट’ करत ‘फ्युजन फूड’ बनवले जातात. तसे न करता पारंपारिक पद्धतीनेच खाद्यपदार्थ बनवायला हवेत. जेवताना टीव्ही, मोबाईल दूर ठेवा. आवश्यक तेवढेच अन्न ताटात घ्या. आहाराविषयी ‘कॉमनसेन्स’ जागृत ठेवायला हवा.’

‘बारीक असणे म्हणजे निरोगी असणे हा गैरसमज आहे. केवळ सेल्फीमध्ये बारीक दिसणे महत्त्वाचे नसून निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. महिलांनी निरोगी जीवनशैलीला प्राधान्य द्यायला हवे. वयाच्या चाळीशीनंतरच महिलेने आरोग्याची काळजी घ्यायची, हा समज दूर व्हायला हवा. त्यासाठी स्वत:च्या आरोग्याकडे महिलांनी लक्ष देणे गरजेचे आहे,’ असे दिवेकर यांनी सांगितले.

‘झाडांची पोषणाची गरज त्यांची मुळे पूर्ण करतात, तशी कुटुंबाची पोषणाची गरज ही कुटुंबातील महिला पूर्ण करते. त्यामुळे तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. महिलांनी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे,’ असे मुकुलिका शहा म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ॲड. चेतन गांधी यांनी प्रास्ताविक केले. वसुंधरा काशीकर यांनी सूत्रसंचालन केले.