पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षेला (एमएचटी-सीईटी) गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदाची विद्यार्थी नोंदणी आणि उपस्थिती सर्वाधिक ठरली आहे. अभियांत्रिकी क्षेत्राचा वाढत असलेला विस्तार, संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अभ्यासक्रमांच्या वाढणाऱ्या जागा, स्थापत्य, मॅकेनिकलसारख्या मूलभूत शाखांना वाढता प्रतिसाद, याच क्षेत्रांत संधी मिळण्याची आशा, अशा कारणांनी विद्यार्थ्यांचा या परीक्षेकडे ओढा वाढत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. गेल्या वर्षी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या ४२ हजारांहून अधिक, अभियांत्रिकीच्या १ लाख ५० हजारांहून अधिक, तर कृषी पदवीच्या सुमारे १८ हजार जागा उपलब्ध होत्या.
अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) एमएचटी-सीईटी परीक्षा आयोजित केली जाते. गेल्या चार वर्षांच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता गेल्या वर्षी, २०१४ मध्ये पहिल्यांदा विद्यार्थी नोंदणीने सात लाखांचा टप्पा गाठला. मात्र, यंदा पहिल्यांदाच सात लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिल्याचे दिसून येत आहे. त्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) या गटासाठी नोंदणी केलेल्या चार लाख ६४ हजार २६३ विद्यार्थ्यांपैकी चार लाख २२ हजार ८६३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) या गटासाठी नोंदणी केलेल्या ३ लाख १ हजार ७२ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ८२ हजार ७३७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.
ज्येष्ठ करिअर समुपदेशक विवेक वेलणकर म्हणाले, अभियांत्रिकी, औषधनिर्माण अशा अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त राहतात, तसेच फार रोजगारसंधी मिळत नसल्याचे चित्र आहे. मात्र, याच क्षेत्रात काहीतरी चांगल्या संधी मिळतील, या भावनेतून एमएचटी-सीईटीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे म्हणता येईल.
वर्ष नोंदणी उपस्थिती
२०२५ ७ लाख ६५ हजार ३३५ ७ लाख ५ हजार ६००
२०२४ ७ लाख २५ हजार ७७३ ६ लाख ७५ हजार ४४५
२०२३ ६ लाख ३६ हजार ८०४ ५ लाख ९१ हजार १३५
२०२२ ६ लाख ६ हजार ७९० ४ लाख ६४ हजार ८२
२०२१ ५ लाख ५ हजार ७८९ ४ लाख १४ हजार ९५६
संगणक, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नव्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता पदवीच्या जागा वाढत आहेत. त्याशिवाय इलेक्ट्रिकल, स्थापत्य, मेकॅनिकल अशा मूलभूत शाखांचाही प्रतिसाद वाढताना दिसत आहे. एकूणच अभियांत्रिकी क्षेत्राचा विस्तार होत असल्याचे चित्र असल्याने विद्यार्थ्यांचाही ओढा वाढत आहे.- डॉ. डी. एन. सोनावणे,कुलसचिव, सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ