लोकसत्ता प्रतिनिधी पिंपरी : गाडीला कट मारल्याच्या रागातून दहा ते ११ जणांच्या टोळक्याने कोयते, लाकडी दांडके, लाथाबुक्यांनी मारहाण करत घरावर दगडफेक करत हल्ला केला. ही घटना चाकणमधील मेदनकरवाडीत घडली. याप्रकरणी चौघांना अटक केली. गणेश किसन जोगदंड (वय २१), तुषार विकास सोनवणे (वय १९), मनोज विनयकांत शर्मा (वय २७) आणि नागेश बळीराम चीम (वय २१, सर्व रा. चाकण ) यांना अटक केली आहे. तर, आशुतोष टिपले, फारुख पठाण, ऋतीक कोरे उर्फ नण्या, विशाल, वैभव भाकरे (सर्व रा. मेदनकरवाडी, चाकण) यांच्यासह त्यांच्या चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विनोद मंगल पाटील (वय ४३, रा. मेदनकरवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आणखी वाचा-अजित पवारांकडून जोरदार हल्लाबोल, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काहींनी…” गाडीचा कट मारल्याच्या किरकोळ कारणावरुन फिर्यादी आणि आरोपी आशीतोष यांच्यात भांडण झाले होते. त्या रागातून आरोपी आशीतोष, फारुख यांनी फिर्यादीला घरात घुसून शिवीगाळ केली. त्यांचा मुलगा परागला घराबाहेर ओढत आणून लाथाबुक्यांनी मारहाण केली. चष्मा फोडला. त्यानंतर सर्व आरोपींनी लोखंडी कोयते, दांडके घेऊन येत फिर्यादीच्या दुचाकीची तोडफोड केली. घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या, दरवाज्यावर कोयता, दांडक्यांनी मारुन मोडतोड केली. घरावद दगड टाकले. आरोपी आशीतोषने तुला आता जिवंत सोडणार नाही, तुला संपवतोच असे म्हणत फिर्यादीच्या पायावर कोयत्याने वार केले. रस्त्याला उभे असलेल्या वाहनांची तोडफोड केली.