पुणे : शैक्षणिक वर्ष २०२५-२६पासून राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीची अर्ज नोंदणी प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू करण्यात येणार असून, अकरावीच्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

राज्य मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष आता दहावीच्या निकालाकडे आहे. राज्य मंडळाने यापूर्वीच दहावीचा निकाल १५ मेपूर्वी जाहीर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. दहावीच्या निकालापूर्वी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत प्रवेश अर्जाचा भाग एक भरावा लागतो. निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्यात येतो. या पार्श्वभूमीवर, अकरावीच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे.

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकरावीच्या प्रवेशासाठी इयत्ता दहावी-समकक्ष परीक्षेचे गुणपत्रक, इयत्ता दहावी शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत, विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस पात्रता प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त वा भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, आजी-माजी सैनिक पाल्य प्रमाणपत्र, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडू विद्यार्थी यांच्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी किंवा विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे प्रमाणपत्र, अनाथ विद्यार्थ्यांसाठी विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांचे प्रमाणपत्र, परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संबंधित देशातील भारतीय दूतावासाची स्वाक्षरी व शिक्का असलेले दाखला-गुणपत्रक, हस्तांतरण आदेश आणि सामिलीकरण पत्र (राज्य शासन, केंद्र शासन, खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बदली झालेल्या पालकांसाठी) अशी कागदपत्रे आवश्यक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.