सिद्धार्थ केळकर
पुणेकरांचे काही खास हळवे कोपरे आहेत. ‘इंटरयुनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रोनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स’ अर्थात ‘आयुका’ हा त्यातील एक. ‘एक काळ होता,’ असे म्हणावे इतकीही ही संस्था खरे तर जुनी नाही. उणीपुरी साडेतीन दशके हा काही तसा ‘ऐतिहासिक’ म्हणावा, असा काळ नाही. पण, पुणेकरांना याचे अप्रूप निश्चित होते, आहे. आकाश निरीक्षणाच्या हौसेला अभ्यासू बनविण्याचे नि:संशय श्रेय ‘आयुका’चे. ‘आयुका’च्या आवारातील शास्त्रज्ञांचे पुतळे विचारमग्न असले, तरी मुक्त आहेत, याचे पुण्याकरिता असलेले मोल अनुभवायचे असेल, तर एकदा तरी ‘आयुका’तील एखादा का होईना कार्यक्रम प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहायला-ऐकायला हवा.
त्यातून ‘आयुका’चे अस्तित्व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात. विद्यापीठाच्या या आवाराने पुण्यातील शैक्षणिक वातावरण शब्दश: घडवले. विविध विद्याशाखांच्या विभागांना भारदस्तपणा असला, तरी तो समोरच्याची छाती दडपून टाकणारा नाही. तो आपलासा करणारा, स्वागतशील आहे. तीच गोष्ट विद्यापीठ आवारातील संशोधन संस्थांच्या बाबतीतही. आयुका, एनसीआरए, एनसीसीएस, सी-डॅक या सगळ्याच संस्थांवर पुणेकरांनी प्रेम केले आहे. विद्यापीठात आपण गणेशखिंड रस्त्यावरील ज्या आनंदऋषीजी महाराज चौकातून जातो, तेथून पाषाणला जाणाऱ्या मार्गावर असलेल्या शैक्षणिक आणि संशोधन संस्था हे पुण्याचे मोठे ज्ञानसंचित. एनसीएल, आयआयटीएम, आयसर, एआरडीई… या आणि अशा संस्था या रस्त्यावरून जाताना एका पाठोपाठ एक दिसतात म्हणजे काय, या प्रश्नाच्या उत्तराचे मोल जाणतेपणाने जाणिवेत रुजवून घ्यावे, असे.
ज्या काळात भारताने जागतिकीकरण स्वीकारले, त्या नव्वदच्या दशकात हा परिसर नवकल्पना, नवसर्जन आणि नवसंशोधनाने सळसळत होता. विद्यापीठाच्या आवारातील ‘आयुका’त डॉ. जयंत नारळीकर आणि त्यांच्या खगोलशास्त्रातील सहकाऱ्यांना संशोधनासाठी आपल्या आकाशापलीकडचे आकाश खुणावत होते; त्याच्या थोडे अलीकडे सी-डॅकमध्ये डॉ. विजय भटकर आणि त्यांच्याबरोबर ‘परम’ संगणकावर काम करणारा संगणकशास्त्रज्ञांचा चमू भारताचा देशी सुपरकम्प्युटर बनविण्यासाठी झटत होता आणि नवसंशोधकांना कायमच व्यापक दृष्टी देणारे, देशभरात विज्ञान लोकाभिमुख करण्यात खूप मोठा वाटा असलेले डॉ. रघुनाथ माशेलकर तेथूनच जवळ पाषाण रस्त्यावरच्या ‘एनसीएल’मध्ये वेगवेगळ्या संशोधनांवर स्वत: काम करता करता इतरांना प्रोत्साहन देत होते. त्या भारावलेल्या नव्वदच्या दशकाअखेरच्या वर्षात, २००० मध्ये पुण्यात झालेली सायन्स काँग्रेस हा या सगळ्याचा कळस होता. अवघ्या दोन-तीन किलोमीटरच्या परिसरात हे तिघे शास्त्रज्ञ एकाच काळात, एका वेळी कार्यरत असणे म्हणजे काय, हे या पुण्याने अडीच-तीन दशकांपूर्वी अनुभवले आहे!
डॉ. जयंत नारळीकर यांचे नुकतेच निधन झाले, त्या वेळी अनेक पुणेकरांकडून या सगळ्या नजीकच्या भूतकाळाची उजळणी झाली. अनेकदा तशी ती होणे आवश्यक असते. अशासाठी, की चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या (इंडस्ट्री ४.०) अखेरच्या टप्प्यात तंत्रज्ञानाचा प्रचंड रेटा उद्योग क्षेत्राची दिशा बदलून टाकत असताना, रोजगाराच्या दिशाही बदलतायेत आणि पर्यायाने शिक्षणाच्याही. व्यावसायिक शिक्षण, कौशल्यवृद्धी हे परवलीचे शब्द बनले असले आणि ते रोजगारक्षम होण्यासाठी आवश्यकही असले, तरी शहरातील उपरोल्लेखित ज्ञानमार्गावर मूलभूत विज्ञानातील दीपस्तंभ उभे आहेत, याचे यानिमित्ताने स्मरण झाले, तर ते हवे आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. ज्या पुणेकरांनी आपल्या विद्यार्थीदशेत जागतिकीकरणोत्तर काळात नारळीकर, माशेलकर, भटकर हे तीन दिग्गज एकत्र कार्यरत असताना पाहिले आहेत, सायन्स काँग्रेस अनुभवले आहे, त्यातील बरेचसे आता पालकांच्या भूमिकेत असतील. त्यांनी याचे महत्त्व आपल्या पाल्यांपर्यंत पोहोचवायला हवे आहे. आणि, ते केवळ स्मरणरंजन म्हणून नाही, तर या स्मृतींतून विज्ञानाची, वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवण व्हावी, म्हणून. मूलभूत विज्ञान हा प्रत्येकाचाच अभ्यासाचा विषय होऊ शकत नाही, पण या शहराचे त्यात काय योगदान आहे, हे माहीत असेल, तर त्याबद्दलचा आदर वाढत राहतो, हे महत्त्वाचे.
डॉ. जयंत नारळीकरांनी या वर्षीच्या विज्ञानदिनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देतानाच, उपस्थितांनाही विज्ञानविषयक प्रश्न विचारले होते. त्यांना आदरांजली वाहताना पुणेकरांनी, त्यांचे स्मरण केवळ समाज माध्यमांत पोस्ट टाकण्यापुरते न ठेवता, वैज्ञानिक म्हणून त्यांनी आपल्याला काय दिले आणि आपण त्यातून विज्ञानाकडे पाहायला कसे शिकलो, शिकत राहू, असा प्रश्न विचारत राहून ठेवले, तर अधिक बरे! तेच अधिक खरे.
siddharth.kelkar@expressindia.com