लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: मुंढवा येथील उड्डाणपुलाची कामे अंतिम टप्प्यात आली असून, डिसेंबर अखेरपर्यंत ती पूर्ण करून नव्या वर्षापासून उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय महापालिका आणि रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. या उड्डाणपुलामुळे मुंढवा परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

मुंढवा, घोरपडी येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी हा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले. मात्र त्यानंतर उड्डाणपुलाचे काम विविध कारणांमुळे रखडले होते. या पार्श्वभूमीवर आमदार सुनील कांबळे यांनी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त बैठक घेतली. उड्डाणपुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत कामे पूर्ण करून उड्डाणपूल नव्या वर्षापासून वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

हेही वाचा… आदिशक्तीकडून गणेशाची आराधना; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर हजारो महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लष्कर भागातील नागरिकांना मुंढवा, केशवनगर, खराडी या भागांत जाण्यासाठी रेल्वे फाटक ओलांडावे लागते. तेथील रहिवाशांनाही पुणे शहरात येण्यासाठी हे करावे लागते. त्यात वेळ वाया जातो, तसेच वाहतूक कोंडीही होते. या मार्गावरून दिवसभरात सुमारे १०४ रेल्वेगाड्या जातात. तेवढ्या वेळा रेल्वे फाटक बंद करावे लागते. त्यामुळे महापालिकेने उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेतले होते.