पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत सुरू केलेले ‘सावली’ बेघर निवारा केंद्र शहरातील गरजू, बेघर व असहाय नागरिकांसाठी आधार बनले आहे. राज्यस्तरीय निवारा संनियंत्रण समितीने केलेल्या निरीक्षणामध्ये हे केंद्र राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट ठरले आहे. या केंद्रातून १६५ व्यक्तींना रोजगारही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
राज्य शासनाने निवारा केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यस्तरीय निवारा संनियंत्रण समिती स्थापन केली आहे. या समितीने त्रयस्थ संस्थेद्वारे राज्याच्या विविध शहरांत असणाऱ्या निवाऱ्यांचे निरीक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार त्रिशरण एनलायन्मेंट फाउंडेशन या संस्थेने निवारा केंद्रांचे निरीक्षण केले. त्यामध्ये पिंपरीतील सावली बेघर निवारा हे केंद्र प्रथम क्रमांकावर आहे.
महापालिकेने २०१९ मध्ये त्रयस्थ संस्थेमार्फत केलेल्या सर्वेक्षणात शहरात १५२ बेघर आढळून आले होते. त्यांच्यासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ऑक्टोबर २०२० मध्ये सावली निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे.
पिंपरी भाजी मंडईच्या पहिल्या मजल्यावर १९ हजार ८६ चौरस फूट जागेवर हे केंद्र असून, निवास क्षमता १११ व्यक्तींपर्यंत आहे. या केंद्रात पुरुष, महिला, बेघर कुटुंबे आणि अपंग व्यक्तींकरिता स्वतंत्र व्यवस्था व सुरक्षित सोयी पुरविल्या आहेत. येथे २३ खोल्या असून, बेघर कुटुंबांसाठी सात खोल्या उपलब्ध आहेत. केंद्राचे व्यवस्थापन ‘रिअल लाइफ रिअल पीपल’ या सामाजिक संस्थेमार्फत केले जाते. ही संस्था दर आठवड्याला शहरातील रेल्वे स्थानक, बसस्थानक, उड्डाणपूल, धार्मिक स्थळे, मेट्रो स्थानके इत्यादी ठिकाणी गस्त घालून बेघर व्यक्तींचे सर्वेक्षण करते. समुपदेशनाद्वारे त्या व्यक्तींना निवारा केंद्रात आणण्याचे काम केले जात असल्याचे सहायक आयुक्त तानाजी नरळे यांनी सांगितले.
१६५ जणांना रोजगार
बेघर व्यक्तींचे पुनर्वसनदेखील केंद्रामार्फत केले जाते. आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून आतापर्यंत ३१२ व्यक्तींचे त्यांच्या मूळ घरी किंवा नातेवाइकांकडे पुनर्वसन करण्यात आले आहे. ५० व्यक्तींना पुनर्वसन करण्यासाठी इतर संस्थेकडे पाठवण्यात आले आहे, तर १६५ व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याचे रिअल लाइफ रिअल पीपल संस्थेचे अध्यक्ष एम. ए. हुसैन यांनी सांगितले.
‘सावली’ निवारा केंद्र हे केवळ गरजू व बेघरांसाठी निवासाचे ठिकाण न राहता त्यांच्या सशक्तीकरणासाठी कार्य करणारे प्रेरणादायी केंद्र बनले आहे. हे केंद्र राज्यातील सर्वोत्कृष्ट ठरले असून, येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत.- शेखर सिंह,आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका