पुणे : जिल्ह्याच्या काही भागात मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पावसामुळे १६ हजार हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले असून ९९४ गावांमधील ५० हजार ५८८ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी ४४ कोटी ५८ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला पाठविला आहे.

जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूरसह नऊ तालुक्यांमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला होता. त्यातही मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पंचनामे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी शासकीय यंत्रणेला दिले होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही पंचनामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना केली होती.

एप्रिल महिन्यात सहा तालुक्यांतील ५२ गावांमधील ५६७ हेक्टर क्षेत्रावरील १ हजार ३९५ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला होता. तर, मे अखेरीस झालेल्या पावसाने १३ तालुक्यातील ४५ हजार शेतकऱ्यांच्या १५ हजार ६७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामध्ये ४१ हजार ३४३ शेतकऱ्यांच्या फळपिके बागायत सोडून १३ हजार २८२ हेक्टर क्षेत्रांचे नुकसान झाले आहे. जिरायत भागातील १ हजार ४५४ शेतकऱ्यांचे ४५८ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच, मे महिन्यात झालेल्या गारपीट तसेच अवकाळी पावसामुळे नऊ तालुक्यांतील ९९४ गावांतील ४ हजार ६८४ शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान झाले आहे. त्यातून एक हजार ७२ हेक्टर इतके क्षेत्र बाधित झाले आहे. जमिनीचे तसेच फळबाग सोडून बागायत आणि जिरायत शेतपिकांचे नुकसान झाल्याने एक एप्रिल २०२४च्या आदेशान्वये सुमारे ४४ कोटी ५८ लाख ४२ हजार रुपयांच्या नुकसान भरपाई देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे केली आहे.

जिल्हा कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाकडे पंचनाम्याचा अहवाल पाठविला आहे. त्या अहवालानुसार, ३३ टक्के पेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यात आले आहे. त्या शेतकऱ्यांनाच मदतीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. कोरडवाहू पिकांसाठी १३ हजार ६०० रुपये प्रती हेक्टर, बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टरसाठी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रतिहेक्टर ३६ हजार रुपये यानुसार आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बारामती, दौंडमध्ये सर्वाधिक नुकसान

जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान दौंड आणि बारामती तालुक्यात झाले असून, अनुक्रमे १० हजार २७५ शेतकऱ्यांचे ३०३२ हेक्टर शेती तसेच ८१९७ शेतकऱ्यांचे २८५९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक कमी नुकसान वेल्हा, पिंपरी चिंचवड या तालुक्यांमध्ये झाले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. बारामती, दौंड आणि इंदापूरमध्ये चार हजार १३४ कुटुंबे बाधित झाली आहेत. त्या प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपयांप्रमाणे चार कोटी १३ लाख ४० हजार रुपयांची मागणी करण्यात येत आहे. बाधित कुटुबांमध्ये पात्र, अपात्र बाधित असे अद्याप निश्चित झाले नसून त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. सध्या सरकारच्या आदेशानुसार तालुका पातळीवर उणे पद्धतीने अनुदान वाटप करण्यात येत आहे.