पिंपरी : ‘हगवणे कुटुंबाने दोन वेळा लग्न मोडले. लग्नात उभे राहणार नाही, लग्न मोडून टाकू, अशी धमकी दिल्यामुळे सोने-चांदी, मोटार अशा त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या पूर्ण केल्या. हे लग्न जबरदस्तीने करावे लागले,’ असे वैष्णवी यांचे वडील अनिल कस्पटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ‘माझी मुलगी गेली, मुलीचे जिवंतपणी हाल झाले. मृत्यूनंतर तिची बदनामी करू नका. मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे वकिलाला शोभत नाही,’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
‘हगवणे कुटुंबाने केलेले कृत्य आणि मुलीचा घेतलेला बळी याला वेगळी कलाटणी देण्यासाठी आणि गुन्हा लपविण्यासाठी त्यांच्या वकिलाने वैष्णवीच्या मोबाइलवरील ‘चॅट’बाबत विधान केले. आरोपीचे वकील चुकीचे बोलले आहेत. मृत्यू झालेल्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे वकिलाला शोभत नाही. पतीने कानाखाली मारली म्हणजे छळ नाही, असे वकिलाचे म्हणणे हास्यास्पद आहे. मुलीवर कसलेही आरोप केले जात आहेत. माझी मुलगी गेली. मुलीचे जिवंतपणी हाल झाले. आता मृत्यूनंतर तिची बदनामी करू नका,’ असे कस्पटे म्हणाले.
‘जावयाला मोबाइल दिला’
‘मी मुलीला मोबाइल दिला होता. मात्र, आरोपी जावयालाही दीड लाख रुपयांचा मोबाइल तीन महिन्यांपूर्वीच दिला होता. त्याचे हप्तेही मी भरत आहे. लग्नाच्या वेळी एमजी हेक्टर मोटार बुक केल्याची ५० हजार रुपयांची पावती दाखविली. मात्र, त्यांनी माझ्याशी वादावादी केली. ही मोटार दिली, तर मी पेटवून देईन. मला फॉर्च्युनरच पाहिजे, असा तगादा लावला. त्यानंतर मी लग्नात ती मोटार दिली. त्यांच्याकडे पाच मोटारी नाहीत. केवळ एकच फोर्ड मोटार आहे,’ असे कस्पटे यांनी सांगितले.
नीलेश चव्हाण कटात सामील
‘राजेंद्र हगवणेचे मोठे बंधू जयप्रकाश हगवणे यांनी उत्तम बहिरट यांना फोन केला आणि बाळाला घेऊन जाण्यास सांगितले. बाळाची खूप हेळसांड होत आहे, ते रडत आहे, त्याचा व्यवस्थित सांभाळ होणार नाही, असे सांगितले. त्यानंतर भाऊ मोहन कस्पटे आणि मेव्हणे उत्तम बहिरट आधी जयप्रकाश हगवणे यांच्या घरी गेले. ते आणि त्यांच्या मुलीसह मोहन कस्पटे आणि उत्तम बहिरट बाळाला आणण्यासाठी वारजे येथे नीलेश चव्हाणच्या घरी गेले. तेथे चव्हाण याने जयप्रकाश यांना पिस्तुलाचा धाक दाखवला. ‘तुम्ही कोण? तुम्हाला आणि इतरांना ओळखत नाही. तुमचा काय संबंध? तुम्ही आजोबा असाल, पण मी तुम्हाला पाहिलेले नाही,’ अशी भाषा त्याने वापरली. नीलेश चव्हाणही या कटात सामील आहे,’ असा आरोप कस्पटे यांनी केला.
‘सुपेकरांच्या जिवावर काहीही करू शकतो’
‘पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर या मामाच्या जिवावर आम्ही काहीही करू शकतो,’ अशी धमकी हगवणे कुटुंबाकडून दिली जात होती. लग्न ठरवतानाही त्यांनी सुपेकर यांचे नाव सांगितले होते. त्यांच्या परिचय पत्रात मामा म्हणून जालिंदर सुपेकर यांचे नाव आहे. वेळोवेळी ते मामाचे नाव घेत असत,’ असे कस्पटे यांनी सांगितले.
पतीसह सासू, नणंद न्यायालयीन कोठडीत
वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी पती शशांक हगवणे, सासू लता आणि नणंद करिष्मा यांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.