पुणे : ‘वेड्याचं घर उन्हात’, ‘प्रेमा तुझा रंग कसा?’, ‘मत्स्यगंधा’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘जिथे गवतास भाले फुटतात’, ‘लेकुरे उदंड जाली’, ‘मला काही सांगायचंय’ आणि ‘हिमालयाची सावली’ अशा अभिजातसंपन्न नाटकांनी मराठी रंगभूमी समृद्ध करणारे ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या रहिमतपूर (जि. सातारा) या जन्मगावी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने त्यांचा अर्धपुतळा साकारण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते रविवारी (२ फेब्रुवारी) या अर्धपुतळ्याचे अनावरण होणार आहे.

परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वामध्ये साताऱ्यातील शाहुपुरी शाखेच्या पुढाकाराने ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या जन्मगावी अर्धपुतळा उभारून त्यांचे यथोचित स्मारक साकारण्यात आले आहे. चौंडेश्वरी शिक्षण संस्था, उमाताई कानेटकर सार्वजनिक वाचनालय, परिषदेची रहिमतपूर शाखा आणि शाहुपुरी शाखा यांच्या वतीने रविवारी सकाळी अकरा वाजता या अर्धपुतळ्याचे अनावरण होणार आहे. आमदार मनोज घोरपडे, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे, अरुण माने, अरुण कानेटकर, परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, शिरीष चिटणीस, रवींद्र बेडकिहाळ, धैर्यशील कदम, संपतराव माने, वासुदेव माने, चित्रलेखा माने-कदम, सचिन बेलागडे या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

प्रा. जोशी म्हणाले, ‘रविकिरण मंडळाच्या संस्थापक सदस्यांंपैकी एक असलेले कवी गिरीश हे कानेटकर यांचे वडील. शिक्षण घेत असताना कानेटकर यांना ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर आणि कन्नड साहित्यिक व सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य वि. कृ. गोकाक या दोन ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचे मार्गदर्शन लाभले. गडकरी, फडके, खांडेकर, आपटे, केतकर या लेखकांच्या साहित्यासह पाश्चात्त्य जगातील इब्सेन, शॉ आणि शेक्सपियर या नाटककरांचा प्रा. कानेटकर यांच्यावर प्रभाव पडला. त्यांच्या ‘घर’, ‘पंख’ आणि ‘पोरका’ या कादंबऱ्या गाजल्या. पण, नाटककार म्हणूनच त्यांना कीर्ती लाभली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही महिन्यांपूर्वीच परिषदेच्या शाहुपुरी शाखेने कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांच्या घराचे स्मारकात रूपांतर करून त्याचे लोकार्पण केले आहे. आता रहिमतपूर येथे प्रा.कानेटकरांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. भावी काळात सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचे स्मारक करण्याचा प्रयत्न राहणार आहे. चौंडेश्वरी शिक्षण संस्थेला प्रा. कानेटकर यांनी त्यांचा तेरा गुंठे जागा असलेला वाडा शाळेसाठी दिला होता. याठिकाणी सध्या कवी गिरीश शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. हा वाडा संस्थेला देण्यासाठी कानेटकर यांचे पुतणे प्रा. अरुण कानेटकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या जागेत कवी गिरीश यांचे स्मारक, कानेटकरांच्या आई उमाताई कानेटकर यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय आहे, असे जोशी यांनी स्पष्ट केले.