पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ९१.८८ टक्के निकाल लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे दीड टक्क्याने निकाल घटला आहे. राज्यभरात राबवण्यात आलेल्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीचा परिणाम निकालात दिसून आला आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी राज्य मंडळात झालेल्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ या वेळी उपस्थित होते. गेल्यावर्षी बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला होता. त्यामुळे यंदाचा निकालात घट झाली आहे.

कोकण विभागाचा सर्वाधिक ९६.७४ टक्के, लातूर विभागाचा सर्वांत कमी ८९.४६ टक्के निकाल लागला. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत ५.०७ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

परीक्षा घेण्यात आलेल्या १५४ विषयांपैकी ३७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला. राज्यातील ८ हजार ३५२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण, २२ हजार ३१७ विद्यार्थ्यांना ८५ ते ९० टक्के, ४६ हजार ३३६ विद्यार्थ्यांना ८० ते ८५ टक्के, ७४ हजार १७२ विद्यार्थ्यांना ७५ ते ८० टक्के गुण मिळाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोसावी म्हणाले, जेईई, नीटसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळण्याच्या दृष्टीने यंदा परीक्षा दहा दिवस लवकर घेण्यात आली. परीक्षेच्या काळात कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी राज्यभरात करण्यात आली. त्यात विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यात भरारी पथकांच्या भेटी, बैठे पथक, परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी, राज्यभरातील ३ हजार ३७३ केंद्रांपैकी ८१८ केंद्रांवर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, परीक्षेशी संबंधित व्यक्ती बदलण्यात आल्या. दरम्यान, यंदाच्या निकालात १३७ विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे, तर १३० विद्यार्थ्यांना प्रतिबंधित करण्यात आले आहे.