दिल्लीवाला

लोकसभेच्या सभागृहामध्ये चहूबाजूंनी कॅमेरे आहेत. कुठल्याही कोपऱ्यात बसलेला सदस्य कॅमेऱ्यात टिपता येतो. संसदेतील कारभार टीव्हीवर दिसू लागल्यापासून कॅमेऱ्यांना महत्त्व आलं आहे. सभागृहाच्या वर वेगवेगळे कक्ष असल्यानं त्यांच्या आधारासाठी सभागृहात मोठे खांब उभे केलेले आहेत. त्या खांबाआड एखादा सदस्य लपला तर कॅमेऱ्यात दिसणार नाही, हा दोष लक्षात घेऊन कॅमेरे लावलेले आहेत. आता आणखी दोन कॅमेऱ्यांची भर पडली आहे. या आधी कधी कक्षांमध्ये टीव्ही कॅमेरे बसवलेले नव्हते. पण आता प्रेक्षक कक्ष आणि पत्रकार कक्ष या दोन्ही ठिकाणी टीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे आणखी अडचण करून ठेवली आहे. हे दोन कॅमेरे बहुधा सभागृहात निदर्शने करणारे विरोधक टीव्हीवर दिसू नयेत याची काळजी घेत असावेत. विरोधी पक्षांचे सदस्य सभागृहातील कॅमेऱ्यासमोर उभे राहून घोषणाबाजी करतात, फलक दाखवतात, मग मंत्र्यांचा चेहरा लपतो. विरोधक निदर्शने करायला लागले की कॅमेरामनची धावपळ होते. त्यांना विरोधी सदस्यांना चकवा द्यावा लागतो. वरच्या कक्षातील दोन कॅमेऱ्यांमुळे विरोधकांना वगळून सत्ताधारी सदस्यांना दाखवण्याची सोय झालेली आहे. लोकसभा सचिवालयाने ही नवी कल्पना राबवून विरोधकांवर एक प्रकारे मात केली. तरीही एक अडचण कायम राहिलेली आहे. ती म्हणजे विरोधक टीव्हीवर न दिसण्याची दक्षता घेतली, पण त्यांचा आवाज कसा बंद करणार? विरोधक लोकसभाध्यक्षांच्या समोरील मोकळय़ा जागेत येऊन घोषणा देतात. सभागृहात त्यांचा आवाज घुमतो. या आवाजामुळं सत्ताधारी सदस्य विशेषत: केंद्रीय मंत्री हैराण झालेले आहेत. केंद्र सरकारला एकामागून एक विधेयके मंजूर करायची आहेत. केंद्रीय मंत्र्यांना ती मांडावी लागतात, त्यासाठी दोन-चार वाक्यं बोलावी लागतात. प्रश्नोत्तराच्या तासाला उत्तरं द्यावी लागतात. विरोधकांच्या घोषणाबाजीत मंत्री बोलत राहतात, ते काय बोलतात, हे त्यांना स्वत:लाही ऐकू येत नाही. त्यावर मंत्र्यांनीच उपाय शोधून काढलेला आहे. केंद्रीय मंत्री पहिल्या वा दुसऱ्या रांगेत बसतात. अधिकृत आसनावरून त्यांना बोलावं लागत. पण, आता ते पीठासीन अधिकाऱ्याची परवानगी घेऊन मागच्या रांगेत कडेच्या आसनावर जाऊन बोलतात. तिथं विरोधकांच्या आवाजाची तीव्रता कमी होते, शिवाय फलक घेऊन विरोधी सदस्यांना पोहोचता येत नाही. शुक्रवारी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील मागच्या रांगेत जाऊन विधेयक सभागृहात मांडले. राज्यसभेतदेखील मंत्री मागच्या रांगेत जाऊन विधेयक मांडतात, चर्चेत सहभागी होतात, प्रश्नांची उत्तरे देतात. नवनव्या क्लृप्त्या काढून सत्ताधारी विरोधकांना पुरून उरले आहेत.

Rajasthan Loksabha Election 2024 Left candidate BJP takes donations from beef selling company
गोमांस विकणाऱ्या कंपन्यांकडूनच भाजपाला देणग्या; राजस्थानमधील एकमेव डाव्या उमेदवाराचा आरोप
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका

कामकाज चालवण्याचं तंत्र

राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांनी नव्या पीठासीन अधिकाऱ्यांमध्ये चार महिला सदस्यांचा समावेश केला आहे. गेल्या आठवडय़ामध्ये नागालँडच्या एस. फान्गनॉन कोन्याक यांनी काही काळ कामकाज चालवलं होतं. त्याचं कौतुक झालं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान यांचा आता पीठासीन अधिकाऱ्यांच्या यादीत समावेश झालेला आहे. यापूर्वी वंदना चव्हाण यांनी अत्यंत कौशल्याने सभागृह चालवलं होतं. या आठवडय़ात राज्यसभेमध्ये विरोधी सदस्यांनी सभात्याग केला होता, सदनातील वातावरण शांत होतं. विनागोंधळ शून्य प्रहर सुरू होता. सभापती धनखडही आसनावर नव्हते. हरिवंशही दिसले नाहीत. नियुक्त खासदार पी. टी. उषा यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिलं. त्या सभागृहात नुकत्याच आलेल्या आहेत, वातावरणाशी जुळवून घेत आहेत. पीठासीन अधिकाऱ्याची नवी जबाबदारीही त्यांच्याकडं आल्यामुळं त्यांना कामकाज चालवण्याचे बारकावेही शिकावे लागत आहेत. शून्य प्रहरात भाजपच्या एका खासदाराने निवड झालेल्या विषयाऐवजी दुसराच विषय मांडायला सुरुवात केल्यावर पी. टी. उषा अचंबित झाल्या. खासदार वेगळय़ाच विषयावर का बोलत आहेत, ते त्यांना कळेना. त्यांनी त्या खासदाराला थांबवून तुम्ही वेगळय़ा विषयावर का बोलता आहात, असं विचारलं. खासदाराने दोन विषय दिले होते, त्यातील एकाची निवड झाली होती. हा प्रकार बघून भाजपच्या इतर खासदार पी. टी. उषांकडून विषयाची खातरजमा करून बोलायला लागले. विषय थोडक्यात मांडायचे असतात, पण काही खासदार जास्त वेळ घेतात. पी. टी. उषा यांना या खासदारांना थांबवणं जमत नव्हतं, मग माइक बंद होत गेले आणि खासदार बोलायचे थांबले. आता खासदारांना थांबवण्याचं तंत्रही त्यांना जमू लागलं आहे.

तुम्ही तर अख्खी एक संस्थाच!

राज्यसभेत कामकाज चालवण्याची प्रत्येक सभापतीची पद्धत वेगळी. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची अख्खी हयात भाजपमध्ये गेली, मोदींच्या आधीपासून त्यांनी केंद्रात मंत्रीपदं भूषवली. वाजपेयी-अडवणींसोबत काम केलं. नायडूंकडं मोठा राजकीय अनुभव होता. त्या अधिकारात नायडू सभागृहात बोलत असत. त्यांचे ‘वनलाइनर’ हा चर्चेचा विषय असायचा. या वनलाइनर फुटकळ असायच्या, त्याला काही फार अर्थ नव्हता. पण, नायडू सदस्यांचं लक्ष वेधून घेत असत. आता नायडूंची जागा जगदीश धनखड यांनी घेतलेली आहे. तेही खूप छान बोलतात. ते सभागृहात आले की, हसून नमस्कार करून सदस्यांना अभिवादन करतात. मल्लिकार्जुन खरगे अधूनमधून रागावतात, तर त्यांना शांत करण्यासाठी धनखड त्यांना म्हणाले, खरगे, तुम्ही म्हणजे एक संस्था आहात. तुमच्याबद्दल मला अतीव आदर आहे!.. खरगेही शांत होऊन त्यांना म्हणाले, त्या दिवशी तुम्ही कदाचित रागावला असाल म्हणून काही बोलता आलं नाही.. त्यावर धनखडांचं म्हणणं होतं, ‘माझ्या लग्नाला ४५ वर्ष झाली आहेत. आता मला राग येत नाही.. मी सर्वोच्च न्यायालयात वकील होतो. इथं पी. चिदम्बरम बसलेत. त्यांना माहिती आहे, न्यायालयात कितीही राग आला तरी, तो दाखवायचा नसतो. न्यायमूर्तीसमोर अदबीनं वागावं लागतं..’ दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मंत्रालयाशी संबंधित प्रश्न होते. गडकरींना प्रश्न विचारताना बहुतांश सदस्य त्यांची स्तुती करतात. गडकरी ती अदबीनं स्वीकारून प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर उत्तर देतात. या स्तुतीमध्ये धनखडही सहभागी झाले होते. देशातील रस्ते-वाहतुकीची सुधारलेली परिस्थिती, परदेशातील स्थिती असा तुलनात्मक अभ्यास धनखड यांनी मांडला आणि गडकरींबद्दल कौतुकोद्गार काढले. त्यानंतर सभागृह तहकूब झालं. मग, गडकरीही धनखडांच्या दालनात गेले. तिथंही गप्पा रंगल्या असाव्यात.

लोकसभा माझ्या परसात..

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे दोन आठवडे पूर्ण झाले, एक आठवडा बाकी आहे. म्हणजे अजून पाच दिवस विरोधकांना सभागृहांत ओरडावं लागणार आहे. ओरडावं लागतंय म्हणून राज्यसभेत विरोधकांनी सभात्याग करायला सुरुवात केली आहे. सभागृहाचं कामकाज सुरू झालं की, घोषणा देणं सुरू होतं. ‘मोदी तुम्ही सदनात या..’ वगैरे घोषणा आलटून पालटून दिल्या जातात. मग, विरोधी पक्ष सदस्यांसमोरील माइक बंद होतो. विरोधकांना सभात्याग करायला आयतं कारण मिळतं. सदस्य बाहेर जातात, माध्यमांशी बोलतात, काही जण घरी निघून जातात, काही जण ‘आप’चे संजय सिंह झाडाखाली आंदोलन करत आहेत, तिथं जाऊन विसावतात. लोकसभेतही हाच प्रकार सुरू आहेत. खरं तर विरोधी सदस्य घोषणा देऊन कंटाळले आहेत. घोषणा देणार तरी किती? केंद्र सरकार म्हणतंय, तुम्ही घोषणा द्या, आम्ही कामकाज चालवतो. सभागृहात ओरडून सदस्यांचे घसे बसले आहेत. शुक्रवारी तर लोकसभेमध्ये धमाल सुरू होती. शाळेची घंटी वाजण्याआधी जसा वर्गात विद्यार्थी कलकलाट करतात तसं चित्र लोकसभेत दिसत होतं. काँग्रेस आणि द्रमुकचे सदस्य लोकसभाध्यक्षांच्या समोरील मोकळय़ा जागेत घोषणा देत होते. हळूहळू त्यांच्या घोषणेतील तीव्रता कमी झाली. काही काळ दबक्या आवाजात त्यांनी घोषणा दिल्या. कोणी घोषणा न देता शून्यात बघत होतं, कोणी घोषणा द्यायचंच विसरलं. कोणी कंटाळा आला म्हणून मागे जाऊन सहकाऱ्याशी उभ्या उभ्या हास्यविनोद करत होतं. शशी थरूर वगैरे काही मंडळांना घोषणेत सहभागी व्हायचं नव्हतं. आपले सहकारी घसाफोड करत असताना आपण निदान उभं राहू असा विचार करून थरूर पूर्ण वेळ आपल्या आसनाशेजारी उभे राहून मोबाइलमध्ये रंगलेले होते. तृणमूल काँग्रेसच्या महिला खासदार घोळका करून पहिल्याच बाकावर गप्पा मारत बसल्या होत्या. त्या ना घोषणेत सहभागी झाल्या, ना त्यांचं कामकाजाकडं लक्ष होतं. या महिला खासदारांच्या चेहऱ्यावर कुतूहल, उत्सुकता दोन्ही दिसत होतं. त्यातील एक महिला खासदार घराच्या परसात बसावं तसं मांडी घालून गप्पा मारण्यात इतक्या गर्क होत्या की, पीठासीन अधिकारी काय म्हणताहेत तेही त्यांना कळलं नाही. या सगळय़ा गलक्यामध्ये लोकसभेत दोन विधेयके मंजूर झाली तरी कोणाला पत्ताही लागला नाही. अखेर पाच मिनिटांसाठी सभागृह तहकूब झालं, बहुतांश सदस्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. शुक्रवारी दुपारनंतर खासगी विधेयकांवर चर्चा होते, ज्यांना ही विधेयकं मांडायची असतात वा ज्यांच्या विधेयकावर चर्चा होणार असते तेवढेच सदस्य सभागृहात उपस्थित राहतात. बाकी आपापल्या मतदारसंघात जाण्यासाठी विमानतळाकडं धावतात.