‘व्यापाराकडून विस्ताराकडे…’ हा अग्रलेख (१३ मे) वाचला. या करारातून अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांना शह देता येईल. ट्रम्प यांनी व्यापार युद्धातून दोस्त राष्ट्रांनाही सोडले नसल्याने फ्रान्स, जर्मनी व ब्रिटनला त्याचा फटका बसला होता. आता इंग्रजांच्या मालाला भारतात थेट आणि स्वस्तात प्रवेश मिळेल. ब्रिटनमध्ये उत्पादित वस्तू चीनइतक्या स्वस्त नसल्या तरीही भारतीय बाजारपेठेला काही प्रमाणात का होईना त्याचा लाभ होईल.
स्थलांतरितांबाबत थोडीशी उदार भूमिका घेणाऱ्या ब्रिटनची अर्थव्यवस्था कोविडोत्तर काळात गाळात रुतलेली दिसते. अल्पावधीत अर्धा डझन पंतप्रधान अनुभवलेल्या ब्रिटनला भारतासारख्या एका विश्वासार्ह मित्राची आणि व्यापारी भागीदाराची गरज होतीच. ती यातून पूर्ण झाली. ब्रिटनमधील अनिवासी भारतीयांची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडून आपल्याला मोठ्या प्रमाणात विदेशी चलन मिळते. भारत-ब्रिटन द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात हाही घटक महत्त्वाचा आहे. जागतिक पटलावर ट्रम्प यांच्या उलट्या धोरणाने विविध सामंजस्य करार करण्याचा समंजसपणा अनेक देश दाखवत आहेत. ती व्यापारी दृष्टिकोनातून आणि जागतिक अर्थव्यवस्था चालती राहण्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा सकारात्मक बाब म्हणावी लागेल. युरोपीय देश आणि ब्रिटनला खूश करण्याच्या नादात रशियाला न दुखावण्याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल. जर्मनीने व अनेक छोट्या देशांनी पुतिनविरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळेच ब्रिटनशी व्यापार हातचे राखून करणे गरजेचे आहे.
● संकेत पांडे, नांदेड
जल्पकांना देशद्रोही का ठरवू नये?
‘झुंडीचा ‘हल्ला’!’ या ‘अन्वयार्थ’मध्ये (१३ मे) ‘जल्पक’ टोळ ‘वरून’ आलेल्या आदेशाचा आपल्या कुवतीप्रमाणे अर्थ लावून विरोधकांवर तुटून पडतात आणि या टोळांची निर्मिती सत्ताधाऱ्यांनी केली आहे, असा दावा आहे तो किती योग्य आहे याची प्रचीती ‘विक्रम मिस्राींच्या ‘ट्रोलिंग’चा सार्वत्रिक निषेध’ ही बातमी (१३ मे) वाचून येते. विशेष म्हणजे टोळांचे निर्माते असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या सरकारातील परराष्ट्र सचिवच आता या टोळांच्या लेखी विरोधक ठरले आहेत. विक्रम मिस्राी आणि त्यांच्या कन्येचे ट्रोलिंग करण्यामागे ‘वरून’ आलेला आदेश असू शकतो, अशी शंका आल्यास ते वावगे ठरणार नाही.
हे टोळ खरे तर डिजिटल दहशतवादीच आहेत. पाक-पुरस्कृत दहशतवादी भारतातील नागरिकांचे बळी घेतात. परंतु हे जल्पक टोळ आपल्या विद्वेषी पोस्ट्स केवळ काही मिनिटांमध्ये देशभरात प्रसृत करून विशिष्ट समाजातील आपल्याच निष्पाप देशबांधवांचे जगणे असह्य करून टाकतात आणि आपल्याच देशाच्या एकतेचे नुकसान करतात. देशाच्या एकात्मतेवर प्रहार करणाऱ्या या टोळांना देशद्रोही का ठरवले जाऊ नये? यापूर्वी २०१८ साली तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनाही या जल्पकांचा तडाखा बसला होता. आज वर्तमान परराष्ट्रमंत्री आणि सचिव जल्पकांच्या तावडीत सापडले आहेत. त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांच्याबाबतीत दाखवलेली असंवेदनशीलता तर केवळ अक्षम्य आहे. जल्पकांचे रूपांतर भस्मासुरात झालेले आहे, हे स्पष्ट होते- जो कधी ना कधी आपल्या निर्मात्यांवरदेखील उलटू शकतो. केवळ निवडणुकीत फायदा होतो म्हणून जल्पकांचे लांगूलचालन करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी देशासमोरील धोका वेळीच ओळखून जल्पकांचा हा दहशतवाद रोखला पाहिजे.
● उत्तम जोगदंड, कल्याण</p>
आवर घातला जाणे शक्य नाही
‘झुंडीचा हल्ला’ हा ‘अन्वयार्थ’ वाचला. जल्पक आपल्यावरच उलटू शकतात याची जाणीव यानिमित्ताने सत्ताधाऱ्यांना झालेली बरी, हा आशावाद फोल ठरण्याचीच शक्यता आहे. मोदी आणि शहा म्हणजेच पक्ष हे समीकरण गुपचूप मान्य करण्यात आल्यामुळे हे जल्पक खुद्द मोदी किंवा शहांच्या विरोधात व्यक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांना आवर घातला जाण्याची सुतराम शक्यता नाही.
नौदल अधिकारी विनय नरवाल यांची पत्नी, नीरज चोप्रा आणि परराष्ट्र सचिव व परराष्ट्रमंत्री ही सर्व मंडळी ना भाजपविरोधक, ना तथाकथित शहरी नक्षल, ना मुस्लीम किंवा पाकधार्जिणे. पण या सर्वांवर हे जल्पक तुटून पडतात तरी सत्ताधारी गप्प राहतात. प्रत्येक निवडणुकीत या जल्पकांचा धार्मिक द्वेष आणि उन्माद राजकीय फायदा मिळवून देत आला आहे, असा सत्ताधाऱ्यांचा ठाम समज झाला आहे. त्यामुळे त्यांना आवर घातला जाण्याची शक्यता नाही. भाजपच्या आयटी सेलमध्ये पूर्वी कार्यरत असलेल्या साध्वी खोसला यांनी उद्विग्न होऊन त्या सेलचा राजीनामा दिला, त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या, ‘माझ्या हिंदू धर्मामध्ये या प्रकारच्या द्वेषाला स्थान नाही. ते अशा रीतीने वागत राहिले तर ते हिंदू धर्माचा नाश करतील. जिंकल्यानंतरही त्यांना केवळ ध्रुवीकरणात आणि द्वेषातच रस आहे. माझ्या या फोनमध्ये भाजपच्या समाजमाध्यम कक्षातून आलेल्या विखारी फॉरवर्ड्सचा एवढा भरणा झाला होता, की ते सारे डिलिट केल्यानंतर मला स्वच्छ आंघोळ केल्यासारखे वाटले.’
● अनिल मुसळे, ठाणे</p>
सत्तेसाठी हातभार हेच जल्पकांचे काम
‘झुंडीचा हल्ला’ हा ‘अन्वयार्थ’ वाचला. उचापती लोक माघारीसाठी मोदींना जबाबदार धरण्याची हिंमत दाखवू शकले नाहीत, असा उल्लेख त्यात आहे. हेच तर जल्पकांचे कौशल्य आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्राी यांना ट्रोल केल्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मनस्ताप झाला असेल. सत्ता मिळवण्यास हातभार लावणे हेच जल्पकांचे ध्येय आहे, त्यामुळेच त्यांनी परराष्ट्र सचिवांच्या विरोधात मोहीम उघडलेली दिसते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पाकिस्तानशी मैत्री हवी होती. तर जल्पकांना पाकिस्तानद्वेष वाढवून सत्ता हस्तगत करावयाची आहे. हाच फार मोठा फरक आहे. अमेरिकेने केलेली शस्त्रसंधी जल्पकांच्या जिव्हारी लागल्याचे दिसते. त्यातूनच त्यांनी परराष्ट्र सचिवांचा छळ सुरू केलेला दिसतो. कारण बिहारची सत्ता मिळवण्यासाठी मदत करणे हेच जल्पकांचे लक्ष्य दिसते.
● युगानंद साळवे, पुणे
उदात्त विचारसरणी हेच मर्मस्थान ठरू नये
‘पहिली बाजू’ सदरातील ‘राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचे महत्त्व’ हा लेख (१३ मे) वाचला. वाघ भक्ष्याला मानेचा चावा घेऊन मारतो, परंतु अस्वल गुदगुल्या करून मारते, असे म्हणतात. एखाद्या व्यक्तीला वा देशाला अंकित करायचे असेल तर बळाचा वापर करता येतोच, परंतु महानता बहाल करूनही तेच उद्दिष्ट साध्य करता येते. भारताबाबत हा प्रयोग पूर्वापार होत आला आहे.
आपल्या संस्कृतीतील शिकवण, म्हणींतूनही याचा प्रत्यय येतो. ‘शत्रूवर प्रेम करा’ ही शिकवण नक्कीच उदात्त आहे. परंतु आपला शत्रूसुद्धा ती पाळत असेल तरच! व्यवहारी जगात ही शिकवण फक्त शत्रूला देण्याकरताच असते. आपली संस्कृती ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ असे शिकवते; परंतु इंग्रजीतील म्हण आहे ‘डू अॅज आय से, नॉट अॅज आय डू!’ आपल्या संस्कृतीत प्रत्यक्ष युद्धभूमीवर उभे राहून सांगितलेल्या कर्तव्यकठोर तत्त्वज्ञानाचे (भगवद्गीता) अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु जगातील सर्वांत घनघोर आणि युद्धे दया आणि क्षमा यांची शिकवण देणाऱ्या संस्कृतींमध्येच झाली आहेत हे लक्षात घेतल्यास त्या इंग्रजी म्हणीचा अर्थ उलगडतो. अहिंसा हा महान गुणच आहे, परंतु हिंसा करण्याची सामरिक व मानसिक क्षमता किती आहे, याची झलक दाखवता आली तरच. आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जातो का याचे भान सतत बाळगले पाहिजे. नाहीतर ‘माझ्या घरी तू आलास तर घर माझे आहे म्हणून तू माझ्या कलाने घे, आणि तुझ्या घरी मी आलो तर तू ‘अतिथी देवो भव’ म्हणणाऱ्या महान संस्कृतीचे पालन कर’ असा प्रकार सुरू होतो! सुरक्षा धोरण ठरवताना आपल्यात खोलवर रुज(व)लेली शिकवण व सांस्कृतिक मूल्ये काय आहेत याची जाण जरूर ठेवावी, परंतु हेतुपुरस्सर तेच आपले मर्मस्थान बनवले जात नाही ना याचेही भान असावे असे वाटते.
● प्रसाद दीक्षित, ठाणे
विराटचा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत ठसा
‘विराटचा कसोटीला अलविदा’ हे वृत्त (लोकसत्ता- १३ मे) वाचले. भारतीय क्रिकेट बोर्डावर झालेला हा ‘सर्जिकल स्ट्राइक’ बोर्डाला आत्मावलोकनास भाग पाडणारा आहे. जगविख्यात फलंदाज कोहली यशस्वी कर्णधारदेखील आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत आपला विराट ठसा उमटविणाऱ्या कोहलीच्या अंगी मैदानावर वीरश्री संचारत असे. सहकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात तो अग्रेसर असे. तंदुरुस्त राहण्यासाठी त्याने घेतलेली मेहनत युवा खेळाडूंसाठी आदर्श ठरावी!
● हेमंतकुमार मेस्त्री, मनोर (पालघर)
loksatta@expressindia.com