‘उरापोटी? कोणासाठी?’ हा अग्रलेख (१६ मे) वाचला. धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी अदानी समूहाप्रमाणे इतरही व्यावसायिक संस्था स्पर्धेत होत्या. कोणत्याही मोठ्या प्रकल्पाचे काम देण्यापूर्वी कंत्राटदारांची क्षमता, अनुभव, त्याचे याआधीचे प्रकल्प, भूसंपादन, शासकीय नियमावलीचे ज्ञान असलेला कर्मचारी वर्ग कंत्राटदाराकडे आहे का, हे पडताळून पाहणे अपेक्षित असते. धारावी पुनर्वसनाचे काम पदरात पडल्यानंतर अदानी समूहाला प्रकल्पासाठी रेल्वेच्या २७ एकर जागेची आणि इतर भूखंडाची गरज भासू लागली. समूहाने या प्रकल्पासाठी कोणत्या तरतुदी कराव्या लागतील याचा अभ्यास आधी केला नव्हता का? प्रकल्प सुरू होण्याआधीच संक्रमण सदनिका निर्माण करण्यासाठी भूखंडाची गरज भासू लागली, म्हणजे सरकारने पुनर्वसनाचा अनुभव नसलेल्या समूहाला काम सोपवले. त्यामुळे धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे भवितव्य अधांतरीच आहे.

● प्रशांत कुळकर्णी, कांदिवली (मुंबई)

भाजपमध्ये अहंकाराचे मेरुमणी

‘भाजपचे नवे वाचाळवीर!’ हा ‘अन्वयार्थ’ (१६ मे) वाचला. भाजपमध्ये गुंडपुंड, धनदांडगे, सत्तेचा माज असलेले, इतरांना कस्पटासमान लेखणारे, बेजबाबदार वर्तन करणारे, काय बोलावे याचे भान नसलेले, लैंगिक अत्याचार करणारे, आपले कोणी वाकडे करू शकत नाही असा अहंकार बाळगणारे, भरसभेत इतरांची खिल्ली उडविणारे, जाती-धर्मांवर बोलण्याची मक्तेदारी आपल्याकडेच असल्याच्या थाटात वावरणारे, अहंकाराचे मेरुमणी डझनावारी आहेत. जेष्ठ नेतेही अशांना पाठीशी घालतात हे त्या पक्षाचे दुर्दैव म्हणावे लागेल. मध्य प्रदेशचे बेताल मंत्री कुवर विजय शहा यांचे वर्तनही- माझे कोणी वाकडे करू शकत नाही अशा माजातूनच झाल्याचे दिसते. या महाशयांनी याआधीही असे आक्षेपार्ह विधान केले आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीने भेटण्यास नकार देताच चित्रीकरण थांबविले. अशा पार्श्वभूमीच्या नेत्याकडे भाजपचे वरिष्ठ नेते कानाडोळा कसे करू शकतात?

● यशवंत चव्हाण, सीबीडी बेलापूर

हा धर्मांधतेचा कळसच

‘भाजपचे नवे वाचाळवीर’ हा ‘अन्वयार्थ’ (१६ मे) वाचला. भाजपची कट्टर हिंदुत्ववादी व मुस्लीमविरोधी भूमिका जगजाहीर आहेच. परंतु ही भूमिका इतक्या शिगेला पोहोचणे आणि लष्करात कर्तृत्ववान अधिकारी असलेल्या महिलेलादेखील केवळ एका विशिष्ट धर्माची असल्यामुळे अपमानास्पद टीकेला सामोरे जावे लागणे हे या देशाचे दुर्दैवच. भाजपचे मंत्री विजय शाह यांचे विधान म्हणजे धर्मांधतेचा कळसच आहे. अशी टिप्पणी करण्याइतपत त्यांची मजल गेली, ती पक्षातील कोणाच्या आशीर्वादामुळे?

● प्रज्ञा राठोड, नागपूर</p>

‘वेळेचे एवढे काय’ हीच मनोवृत्ती

‘विधेयकांसाठी कालमर्यादेवर राष्ट्रपतींचा सवाल’ ही बातमी (लोकसत्ता- १६ मे) वाचली. देशाच्या प्रथम नागरिकाने उपस्थित केलेला हा प्रश्न ‘वेळेचे एवढे ते काय’ या आपल्या समाजात खोलवर रुजलेल्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतो. सरकारचे उच्चस्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या महोदयांना वेळेत काम करायला सांगणे म्हणजे अब्रह्मण्यच! सरकारी बाबूंच्या काम केले तर करू, या मूलभूत अधिकारावरच सर्वोच्च न्यायालयाने गदा आणली जणू! आम्हाला विचारणारे तुम्ही कोण हा सरकारी बाबूंचा तोरा बहुतेक जण कधी ना कधी अनुभवतातच. गतिमान प्रशासन वगैरे नुसत्या कागदी घोषणाच आहेत का?

● प्रवीण नेरुरकर, माहीम (मुंबई)

माणूस शस्त्रप्रेमी दाखवणे एकांगी

‘शस्त्र – नि:शस्त्र’ हा ‘लोकलौकिक’ सदरातील सुहास सरदेशमुख यांचा लेख वाचला. त्यात सरस्वती वगळता नि:शस्त्र दैवत दिसले नाही, असे म्हणताना नि:शस्त्र, कमरेवर हात ठेवून निव्वळ साक्षी भावाने पाहणारा विठ्ठल दुर्लक्षित राहिला आहे. त्याच्याभोवती असणाऱ्या संतांहाती कुठलेही शस्त्र नसतानाही त्यांच्याबाबत लोकाकर्षण जास्तच आहे. दत्त गुरूंच्या हातीही शस्त्र नाहीत. दैवत म्हणून मान्यता असणारे साईबाबा, स्वामी समर्थ, गजानन महाराज नि:शस्त्र रूपात होते. ख्रिाश्चन धर्मीयांचा येशू आणि रूपच नसलेला अल्लाह पाहता, मानवाला भक्तीसाठी दैवतांच्या हाती शस्त्र देण्याची गरज नसते, हे दिसते. माणसाला सदासर्वकाळ शस्त्रप्रेमी दाखवणे एकांगी वाटते. बहुसंख्य माणसे भीती किंवा गरजेच्या वेळीच शस्त्राचा विचार करतात, त्याचे शिक्षण घेतात. भारत हा पाकिस्तानपेक्षा शक्तिशाली देश असूनही बहुसंख्य भारतीयांचा युद्ध नकोच हाच पवित्रा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● श्रीनिवास बाळकृष्ण, मुंबई</p>