राजेश बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९४९ मध्ये एका दौऱ्यात आलेला अनुभव सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘आदर्शता ही सर्वच कार्यात, जीवनात व मरणातही असू शकते पण त्या आदर्शतेचा आविष्कार उच्च विचारसरणीतून व देशकालपरिस्थितीच्या जाणिवेतूनच व्हायला हवा. मला एकदा काही मित्रांनी एका शहरात ‘आदर्श कुटुंब मंडळाला’ भेट देण्यास नेले व त्याच विषयावर बोलायला लावले.’’

‘‘मी प्रथम त्या सर्व मंडळींची व त्यांच्या नोकरमाणसांचीही ओळख करून घेतली आणि मग भाषणास सुरुवात केली म्हणालो- ‘आदर्शता आपल्या सुखसोयींवरच अवलंबून नसून ती आपल्यावर अवलंबून असलेल्या व आपल्या संपर्कात येणाऱ्या अशा लोकांच्या व्यावहारिक स्थितीवरही निर्भर असते. तुम्ही लोक मला राजेरजवाडय़ांप्रमाणे दिसता. तुमच्या प्रत्येकाच्या अंगावर घडय़ाळे, कपडे व दागिने मिळून हजारों रुपयांचा तरी ऐवज आहे. याच मानाने तुमची राहणी असले तर तुमच्या या आदर्श मंडळाला ‘स्वार्थी समाजद्रोही मंडळ’ म्हणायला मी तरी मागे-पुढे पाहणार नाही. ज्या देशातील बहुसंख्य लोकांच्या अंगाला अंगभर जाडेभरडेही कापड नाही तेथे तुम्ही ‘आदर्श’ म्हणून भरजरी पातळे नेसणार आणि परदेशी कापडांच्या झुली घालून तुम्ही मिरवणार? याला मी कोणत्या तोंडाने आदर्श म्हणावे कळत नाही. या नोकरांच्या कपडय़ांना पन्नास ठिगळे आहेत, संपूर्ण किटलेल्या टोप्या आहेत. दुसऱ्यांचा प्रश्न सोडा पण तुमच्या नोकरांना तरी तुमच्यामुळे समाधान लाभत आहे काय आणि  नसेल तर तुमच्या आदर्शाला कोण विचारणार? हे सर्व पाहात असता, ‘एक विचारशून्य शौकिन मंडळ’ हे नाव या मंडळाला देण्यास कोणती हरकत आहे?’’ असा प्रश्न महाराज करतात.

श्रोत्यांची क्षमा मागून महाराज म्हणतात ‘‘मित्रांनो! एरवी मी तुमच्याशी मोठय़ा प्रेमाने बोललो असतो, पण तुम्ही आदर्शाचा विषय माझ्यासमोर ठेवला तेव्हा मला कर्कश होऊनच तुमच्याशी बोलणे प्राप्त झाले आहे. ‘आपण या नोकरांच्या घरी कधी गेला होता काय?’ ते म्हणाले, ‘नाही’. ‘कधी त्यांच्या घरच्या बिमारीची विचारपूस तुम्ही केली काय?’, उत्तर ‘नाही’. मी म्हणालो,‘‘मग सांगा की तुमच्या मंडळाकडे कोणत्या आदर्शाच्या चष्म्यातून मी पाहू? अरे, दुसऱ्याचे बरे करण्यात आदर्शत्व असते की उपभोग-शृंगारात?’ माझं भाषण संपल्यावर त्यातील एक गृहस्थ म्हणतो- ‘महाराज, अहो याचं नाव आहे आदर्श मंडळ, म्हणून काय आम्ही थोडेच आहोत आदर्श?’ मी म्हणालो- ‘असं असं! तर मग शौकिन क्लब म्हणा की या मंडळाला!’ ते आपसात कुजबुजू लागले – ‘काय रे गडय़ा! दुसरा विषय बोलायला दिला असता तर बरं झालं असतं, नाही का? उगीच आपण मोठय़ा विषयाच्या फंदात पडलो.’ मी ऐकून म्हणालो, ‘तुम्ही कोणताही विषय मला दिला असता तरी मी हेच सांगितलं असतं नां? कारण याच विषयाची समाजाला सध्या सर्वात अधिक आवश्यकता आहे. लोकसुद्धा आज खरा आदर्श काय?’ हेच विचारतात व उच्चारतात, फक्त कोणी तसे वागत नाहीत.

rajesh772@gmail.com

More Stories onमराठीMarathi
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtrasant tukdoji maharaj share experience during a tour in 1949 zws
First published on: 07-06-2023 at 04:28 IST