आधी मातृभाषा तरी नीट शिकवा’ हा डॉ. तारा भवाळकर यांचा लेख, तसेच रसिका मुळ्ये आणि किशोर दरक यांचे लेख (२२ जून) वाचले. रविवार्तामधील ‘महाराष्ट्राच्या शिक्षणाची दोरी बिहारींच्या हाती’ हे वृत्तही वाचनात आले. पहिलीपासून तीन भाषा शिकणे अनिवार्य करणाऱ्या निर्णयामागे काय तार्किक विचार आहे, हे अजूनही समजलेले नाही. कधी काळी सर्व क्षेत्रांत नेतृत्व करणारा महाराष्ट्र आज इतका कणाहीन आणि नेतृत्वविहीन झाला आहे की राजकारण्यांकडून काही अपेक्षा ठेवणे व्यर्थ वाटते.

पण ज्यांची मराठी ही पोटापाण्याची भाषा आहे, उदा. मराठी पत्रकार, लेखक, नाटककार, कलाकार, शिक्षक इत्यादी, त्यांनी तरी याविषयी ठाम भूमिका घेतली पाहिजे. दरवेळी मराठीच्या प्रश्नावर शिवसेना, मनसे किंवा ठाकरे बंधूंवर बोट ठेवून चालणार नाही. आणि हेही लक्षात घ्यावं लागेल की आजचे ठाकरे बंधू काही प्रबोधनकार किंवा बाळासाहेब ठाकरे नाहीत. आज दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांची भूमिका मराठीविरोधी वाटते आणि इतर प्रादेशिक पक्ष त्यांच्या दावणीला बांधलेले दिसतात. अशा परिस्थितीत आता ‘पुराणातील वांगी’ झालेला ‘मराठी बाणा’ प्रत्येकाने जागा करणे अत्यावश्यक आहे. मराठी भाषेवरील आक्रमणासारख्या विषयावरही आपल्याला उदाहरणे दाक्षिणात्य राज्यांची द्यावी लागत असतील, तर ती महाराष्ट्राच्या अधोगतीची गंभीर पावती आहे.

● सौरभ काळेकोल्हापूर

आर्थिक यशासाठी तिसरी भाषा?

आधी मातृभाषा तरी नीट शिकवा’ हा डॉ. तारा भवाळकर यांचा लेख वाचला. लेखात चौथीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतून दिल्याने भाषा पक्की होते व नंतर कोणतीही भाषा किंवा विषय शिकणे कसे सहजशक्य होते ते प्रतिपादन केले आहे, ते योग्यच वाटते. अलीकडे पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांत घालतात तेही योग्य नाही. मराठी माध्यमात शालेय शिक्षण घेऊनही उच्च पदावर पोहोचलेल्यांची कितीतरी उदाहरणे आहेत. त्यामुळे आर्थिक यशासाठी पहिलीपासून तीन तीन भाषा शिकण्याची आवश्यकता नाही.

● रमेश वेदकचेंबूर, मुंबई</p>

लोकांचे लक्ष वळवण्याची चाणक्यचाल

तुही भाषा कंची?’ संपादकीय वाचले. नजीकच्या भविष्यात संसदेत काही विवाद्या विधेयके येऊ घातलेली आहेत त्यावरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळवण्याची ही चाणक्यचाल असू शकते. आपल्याला लागोपाठ दुसऱ्यांदा संसदेत बहुमत मिळाले आहे आणि या जनाधाराला धक्का देण्याइतका विरोधी पक्ष समोर दिसत नसल्याने निर्माण झालेल्या व वाढत चाललेल्या उद्दामपणाचे देखील दर्शन या वक्तव्यातून होते. ‘अंग्रेजी हटाव’ या इतिहासजमा झालेल्या घोषणेचे पुनरुज्जीवन करणे हे भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन पावन करण्याइतके सोपे नाही हे लक्षात घेतले पाहिजे. ‘शेक्सपिअर मला आवडत नाही’ असे म्हणणाऱ्याला ‘यू आर द लूजर, नॉट शेक्सपिअर’ असे दिलेले उत्तर प्रसिद्ध आहे. तसे ते अशा लोकांना इंग्लिशबाबत दिले तर योग्य ठरेल.

● गजानन गुजरपाध्ये

राज्यकर्तेच मराठीचे मारेकरी?

महाराष्ट्रात राहणाऱ्या बहुसंख्य लोकांना हिंदी मोडकीतोडकी का होईना, पण बोलता, वाचता, समजता येते. चित्रपट, जाहिराती, दूरचित्रवाणी वाहिन्या, गाणी, मोबाइलवरील व्हिडीओ यांमधून हिंदी भाषा प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली आहे. अगदी लहान मुलेही हिंदी संवाद आणि गाणी सहजपणे बोलतात. त्यामुळे शाळांमध्ये ती बळजबरीने शिकवण्याची गरज काय? ही जबरदस्ती म्हणजे संविधानाने दिलेल्या भाषिक स्वातंत्र्याचाच अपमान होय.

अक्षय भूमकरपंढरपूर, सोलापूर

विद्यार्थ्यांचा पाया पक्का होण्याची गरज

मुलांनी पहिलीपासून कोणतीही तिसरी भाषा का शिकायची?’ हे विश्लेषण वाचले. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा मराठी, इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास, इतिहास (चौथी) या विषयांचा पाया पक्का होण्याची गरज आहे, विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण देण्याची गरज आहे, राहिला विषय हिंदीचा, हिंदी ही देवनागरी लिपीत लिहिली जाणारी भाषा असल्यामुळे समजण्यास इतकी कठीण नाही. म्हणून चालू पद्धतीनुसार पाचवीपासून हिंदी भाषा शिक्षण योग्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा विचार करून सरकारने काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.

● ओंकार मोकळेसांगली (वांगी)

दरवाजे बंद करून अपघात टाळणार कसे?

रेल्वेचे अपघात टाळण्यासाठी लोकलचे दरवाजे बंद व्हावेत’, असे निर्देश उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. पण हा पर्याय अजिबात व्यवहार्य नाही. सर्वसाधारणपणे सात ते दहा वाजण्याच्या सुमारास, रेल्वे स्थानकांवर, चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज स्थानकांवर जाण्यासाठी अतोनात गर्दी असते. गाडीत घुसण्यासाठी माणसांची रीघ आणि रेटारेटी, गाडी उभी असेपर्यंत अविरत आणि अखंडपणे सुरू असते. ही स्थिती गाडी सुटेपर्यंत सुरूच असते. त्यामुळे ट्रेनचे दरवाजे कसे आणि कधी बंद होणार? दरवाजे बंद होण्याच्या कालावधीतही ही रेटारेटी सुरूच असणार हे वास्तव आहे. एसी गाडीच्या तिकिटांचे दर तुलनात्मकदृष्ट्या जास्त असल्यामुळे एवढ्या गर्दीचा प्रश्न येत नाही. शिवाय साध्या गाडीचे दरवाजे बंद केल्यामुळे हवाही डब्यात खेळती राहणार नाही. त्यामुळे गुदमरून जाण्याचे प्रसंग उद्भवू शकतात. एकंदरीत लोकलच्या बंद दरवाजांबाबतचा प्रस्ताव चुकीचा आणि अव्यवहार्य वाटतो.

● अजित शेट्येडोंबिवली

हे षड्यंत्र मोडूनच काढा…

तिसऱ्या भाषेसाठी तासिकांच्या वेळेला कात्री’ ही बातमी (२१ जून) वाचली. खेळ, बाललीला, छोट्या छोट्या कलात्मक कृती करत मुले शिकतात. चित्रकला, संगीत यातून व्यक्त होतात. कला, क्रीडा ही त्यांची प्रमुख भाषा आहे. यावर आडकाठी आणून बालक, शिक्षक, पालक यांना नसत्या ओझ्याखाली दामटविण्याचा हा क्रूर प्रकार दुर्दैवी आहे. पालक, शिक्षक, समाजमाध्यमे यांच्या तीव्र विरोधाला न जुमानता सरकारचा हा मनमानीपणा समाजविघातक आहे. महाराष्ट्राचे हिंदीकरण करण्यासाठी हे मुद्दाम रचलेले षड्यंत्र आहे.

शिक्षणतज्ज्ञ व बालमानसतज्ज्ञांच्या मते मुलांवर सक्ती केल्यास बालमनांवर अनैसर्गिक दबाव येऊन मुलांमध्ये मानसिक विकृती निर्माण होते. मुलांचे वय, संवेदनशीलता, शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमता पूर्णत्वाने विचारात घेऊन शिक्षणातील बदल स्वीकारले जावेत. खेळांचे तास कमी करणे हे क्रौर्य आहे. ह्या अनावश्यक व घातक त्रिभाषा सूत्राच्या दबावाखाली सुज्ञ पालक व शिक्षकांनी मुळीच न येता शाळांमधील शिक्षक-पालक समितीने या संकटावर तोडगा काढून वेळापत्रकातील तिसऱ्या भाषेच्या तासाला विद्यार्थ्यांना चक्क खेळायला सोडावे. यासाठी बालमानसतज्ज्ञांची मदत घेऊन न्यायालयात याचिका दाखल करता येईल. पण निरागस बालकांवरील अन्याय सहन करता कामा नये.

● मंजूषा जाधवखार, मुंबई

रंगभूमीला संपन्न केले

तळटीपाया सदरात ‘‘आधे अधुरे- तरीही परिपूर्ण! ’’ या लेखात आसाराम लोमटे यांनी हिंदीतील आधुनिक लेखक मोहन राकेश यांच्या नाटकांचा परिचय करून दिला आहे. या सदरातून भारतातील अन्य भाषक साहित्यिकांचा परिचय करून देण्याची कल्पना छान आहे. राकेश मोहन यांच्या अल्पायुष्यात त्यांनी कविता वगळता सर्व साहित्य प्रकारात लेखन केले पण त्यांना दिगंत कीर्ती मिळाली ती नाटककार म्हणून. त्यांच्या ‘आधे-अधुरे’ या नाटकातील समस्या आधुनिक सामाजिक जीवनाशी निगडित आहेत. हे नाटक सध्याच्या जीवनातील काही तीव्र विडंबनात्मक बाबींवर प्रकाश टाकते. या नाटकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची भाषा, ज्यात समकालीन जीवनातील ताणतणाव टिपण्याची कला आहे. त्यातील पात्रांच्या मानसिक अवस्था वास्तववादी आणि विश्वासार्ह आहेत. एका पातळीवर, हे नाटक स्त्री आणि पुरुष यांच्यातील आसक्ती आणि तणावाचा दस्तऐवज आहे. ‘आषाढ़ का एक दिन’ या नाटकात राकेशजींचा उद्देश केवळ महान कवी कालिदासची कथा सांगणे नाही, तर एका कवीच्या मनाचे स्पष्टीकरण देणे आहे. म्हणूनच कथानकात ऐतिहासिक पात्रांसह काल्पनिक पात्रे निर्माण केली आहेत. आजच्या पार्श्वभूमीवर कालिदाससारखे पात्र पाहिले आहे. सर्जनशील अनुभव असलेली नाटके देऊन राकेशजींनी हिंदी रंगभूमी आणि नाट्यकर्मींना संपन्न केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● लक्ष्मण संगेवारनांदेड