दिल्लीतील पक्षाच्या आयटी सेलच्या मुख्यालयात सकाळपासून एकाच मुद्द्यावर घनघोर चर्चा सुरू होती. देशातील काही महत्त्वाच्या राज्यांत होणाऱ्या निवडणुका विनासायास जिंकायच्या असतील तर जनमानसातील युद्धज्वरात वाढ करण्यासाठी काय करता येईल यावर बिनीचे भक्त तावातावाने मत मांडत होते. ‘सिंदूर’ वाटपाचा कार्यक्रम नमनालाच गुंडाळावा लागल्यामुळे अस्वस्थ झालेला प्रत्येक जण जबाबदारीने बोलत होता. तेवढ्यात एकाने वर्तमानपत्रातील एका बातमीचे कात्रण साऱ्यांच्या पुढ्यात सरकवले.
‘कोलकातामधील जगन्नाथपुरी यात्रेतील रथाला सुखोईचे टायर’. हे वाचताच अनेकांचे डोळे एकाचवेळी चमकले. धर्म, श्रद्धा व युद्धज्वर याची सांगड घालायची असेल तर बातमीत नमूद केलेल्या घटनेला सार्वत्रिक रूप देण्यावाचून पर्याय नाही यावर साऱ्यांचे एकमत झाल्यावर मग ते द्यायचे कसे यावर खल सुरू झाला. देशभरात अनेक रथयात्रा निघतात. त्या काढणारे बहुतांश लोक आपलेच आहेत. त्या साऱ्या रथांना सुखोईचे टायर लावायला सांगायचे. त्यासाठी लागणारा अर्थपुरवठा गुप्त पद्धतीने करायचा. टायर लावण्याच्या कार्यक्रमाच्या बातम्या प्रकाशित करवून घ्यायच्या. सार्वजनिक पातळीवर याचे समर्थन करताना आपल्या देवांनीसुद्धा अनेक युद्धे लढली पण प्राचीन अस्त्राने. आता काळ बदलला. तेव्हा त्यांची भक्ती करताना लढाऊ विमानांसाठी वापरले जाणारे टायर वापरून एकप्रकारे आपण देवांचाच आशीर्वाद घेत आहोत. या देशातील देव शक्तिशाली झाले की माणूसही होईल. एकदा का प्रत्येक व्यक्ती सामर्थ्यवान झाली, की देशही शक्तिशाली होईल व शत्रूराष्ट्र वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही. जे टायर युद्ध जिंकून देतात ते देवाचेही मन जिंकून देतील असा प्रचार करायचा. यामुळे यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या मनात युद्धाची खुमखुमी जागी होईल व ज्वर वाढण्यास मदत होईल. या प्रयोगाची सुरुवात पश्चिम बंगालमधून झाली आहेच. यावेळी तेथे दीदीला धोबीपछाड सहज देता येईल असे सेलच्या प्रमुखाने सांगताच उपस्थित सर्वांनी आपापल्या राज्यातील रथांची माहिती घ्यायला सुरुवात केली. हे टायर लावलेला रथ यात्रेत फिरवताना त्याचीच प्रसिद्धी जास्त होईल हे प्रत्येकाने बघायचे. आपल्यापैकीच काहींनी टायरची पूजा करतानाची व लिंबू-मिरची ठेवतानाची छायाचित्रे प्रसिद्धीला द्यायची. चॅनलवाले सोबतीला आहेतच. एकदा का हे लोकांच्या नजरेत पडले की पूजेसाठी भाविक आपसूकच गर्दी करतील. अनेक ठिकाणी यात्रेचे आयोजक परवडत नसल्याने रथाला ट्रॅक्टरचे टायर लावतात. त्यांनाही हे टायर घेण्यासाठी मदत करायची. रथयात्रा सुरू असताना लाऊडस्पीकरवरून पाकिस्तानला युद्धात वठणीवर आणणारे हेच ते टायर असे जोरात सांगायचे. बघा, मग कसा युद्धज्वर पेटतो ते असे प्रमुखांनी सांगताच सर्वांनी टाळ्या वाजवल्या. हा तर परंपरा व नवतेचा संगमच असे विधान एकाने करताच साऱ्यांनी त्याच्याकडे हास्यमुद्रेने बघितले.
बैठक संपताच देशभरात जशा सूचना जाऊ लागल्या तसे यात्रेचे संयोजक सुखोईसाठी टायर तयार करणाऱ्या चेन्नईच्या कंपनीकडे धाव घेऊ लागले. प्रारंभी तेथील अधिकाऱ्यांना काय उत्तर द्यावे हेच कळेना. कुणाला नाही म्हटले की थेट दिल्लीहून शिफारशीचा फोन येऊ लागल्याने नकाराची सोयसुद्धा बंद झाली. सुखोईचे जुने व मोल्ड केलेले टायर काहींना देण्याचा प्रयत्न कंपनीने केला पण दिल्लीतील लोकांनी तो हाणून पाडला. अखेर सर्वांच्या ऑर्डर वेळेत पूर्ण करण्यासाठी कंपनीने उत्पादनक्षमता वाढवली. त्याचदरम्यान सैन्यदलाकडून टायरची मागणी नोंदवण्यात आली. वैतागलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सध्या ती पूर्ण करता येणे शक्य नाही, असे कळवून टाकले. बिचारे ते तरी काय करणार? शेवटी रथ महत्त्वाचा!