इंग्रजीत ‘यू कॅन नॉट हॅव केक अँड ईट इट टू’ अशा अर्थाचा वाक्प्रचार आहे. म्हणजे तुम्हास केक हातातही हवा आणि खायचा पण आहे, असे दोन्ही एकाच वेळी साध्य करता येत नाही. अजितदादा पवार यांना आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रास्त्राने या वाक्प्रचाराचा अर्थ लगेच लक्षात येईल. अजितदादांचे सर्व राजकारण केक हातातही ठेवायचा आणि खायचा देखील; असे दुहेरी पद्धतीने चालते. नवाब मलिक यांच्या पाठिंब्याच्या मुद्द्यावर गुरुवारी पत्र लिहून – आणि मुख्य म्हणजे ते प्रसिद्ध करून – फडणवीस यांनी ते उघडे पाडले. त्यामुळे अजितदादा यांस फडणवीस म्हणजे काही आपले काका नाहीत, याचीही जाणीव होईल.

प्रश्न मलिक यांच्यावरील गंभीर आरोपांच्या सत्यासत्यतेचा नाही. ते सत्य आहेत असे मानून घेतलेल्या भूमिकेचा आहे. याची जाणीव फडणवीस यांनाही झाली, हे बरे झाले. उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडल्यानंतर आणि पक्षादेश शिरसावंद्या मानून एकनाथ शिंदे यांच्या सरकारात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागल्यानंतर आज पहिल्यांदा फडणवीस यांनी ‘स्वत:ची’ म्हणून एक भूमिका घेतली. ती घेण्यास त्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने किती भाग पाडले आणि किती त्यांची स्वत:चीच तशी इच्छा होती या प्रश्नाच्या उत्तरात राज्याच्या राजकारणाची आगामी दिशा असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तूर्त तरी फडणवीस यांच्या या पत्रास्त्राने त्यांचे सह-उपमुख्यमंत्री हेच अधिक घायाळ होणार हे निश्चित. तथापि फडणवीस यांचा हा नैतिक रेटा मलिक यांच्यापाशीच न थांबता पुढेही जायला हवा.