डॉ. गणेश अंकुश चव्हाण
आपल्या समाजात ‘मूल्यमापन’ या संकल्पनेला जी केवळ शैक्षणिक किंवा प्रशासकीय प्रक्रिया म्हणून सुरुवात झाली होती, ती मात्र, आज संपूर्ण समाजात एक अदृश्य स्पर्धा निर्माण करणारी ठरली आहे. दरवर्षी दहावी व बारावीचे निकालाचे दिवस म्हणजेच कुटुंबांमध्ये एक प्रकारची धाकधूक आणि एकाच वेळी आशेचा व अपेक्षेचा मोठा कल्लोळ असतो. घराघरात टक्केवारीच्या आकड्यांची चर्चा रंगते, एकमेकांना गुण विचारले जातात, सोशल मीडियावर अभिनंदनाच्या पोस्ट्स झळकतात व पालकांना आपल्या पाल्याचे टक्के इतरांच्या तुलनेत कसे आहेत हे अधिक महत्वाचे वाटते. शाळांची, महाविद्यालयांची जाहिरात सुद्धा टक्केवारीच्या आधारावर ठरते.
एवढ्या एका आकड्यांच्या चौकटीत आपण एका विद्यार्थ्याची, त्याच्या गुणांची किंमत लावतो. या टक्केवारीच्या मानसिकतेने घराघरांत मुलांची ओळख ठरवली जाते, शिक्षकांच्या कर्तृत्वाची यशाची जाहिरात केली जाते. मुलांच्या अभ्यासाच्या प्रक्रियेत आणि जीवनशैलीत मूल्यमापनाचा इतका मोठा प्रभाव झाला आहे की शिकणे ही सहजतेची गोष्ट राहिली नाही, ती एक स्पर्धेची लढाई बनली आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वजण एका महत्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत आहोत, हे गुण विद्यार्थ्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्व विकासाची खरीखुरी प्रतिमा दाखवतात का?
घराघरांतून पालकांनी प्रकल्पांचा भार स्वतःच उचलण्याची जी नवी पद्धत जन्माला घातली आहे, ती याच मानसिकतेची लक्षणीय परिणती आहे. बारीकसारीक प्रकल्पसुद्धा स्वतःच्या हातून मुलांऐवजी पालक पूर्ण करताना दिसतात, हे केवळ ‘माझ्या मुलाचा प्रकल्प सर्वोत्कृष्ट असला पाहिजे’ या अहंभावातूनच नव्हे, तर त्यामागील गुण मिळवण्याच्या अनावश्यक स्पर्धेने जन्माला घडवलेले आहे. अशा परिस्थितीत प्रकल्प शिक्षणामागचा खरा हेतू स्व-अनुभवातून शिकणे, सर्जनशीलता, प्रयत्नशीलता आणि विचारमंथन हा कुठेतरी हरवतो.
आपण खरोखर शिक्षणाचा मूळ हेतू विसरत चाललो आहोत का? याचा खोल विचार करण्याची हीच खरी वेळ आहे.
शिक्षण म्हणजे केवळ गुणांची आकडेमोड नव्हे; ते व्यक्तिमत्त्वाची घडण, स्वतंत्र विचारशक्ती, सर्जनशीलता आणि मूल्यांचं विकासकेंद्र आहे. आपण भारतीय संस्कृतीत शिक्षणाकडे कधीच केवळ परीक्षेपुरत्या यशापयशाच्या चौकटीत पाहिलं नव्हतं. उलट ‘सा विद्या या विमुक्तये’ म्हणजेच ज्ञान हे मुक्त करणारे असावे, हा आपल्या शिक्षण परंपरेचा आधारस्तंभ राहिला आहे. हे ज्ञान विद्यार्थ्याला आपल्या मनाच्या मर्यादा, समाजाच्या संकुचित चौकटी आणि विचारांच्या बंदिस्त चौकटींपासून मुक्त करतं. पण आजची आपली मूल्यांकन प्रक्रिया हेच विसरत चालली आहे. शिक्षणाने विद्यार्थ्याला मुक्त करायचं सोडून त्याला एक टक्केवारीच्या गृहीतकांच्या बेडीत अडकवले आहे.
आज अनेक पालक वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी धावपळ करत असतात. जास्त गुण मिळाले म्हणून अतोनात अपेक्षा बाळगणे आणि कमी गुण मिळाले म्हणून निराश होणे, या दोन्ही टोकांच्या भावना अनेक घरांत सध्या दिसून येतात. पण पालकांनी लक्षात घ्यायला हवं की मिळालेली टक्केवारी ही विद्यार्थ्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाची परिपूर्ण मोजणी नव्हे.
जास्त गुण मिळाले म्हणून पालकांनी पाल्यावर अधिकाधिक अपेक्षांचा बडगा उगारू नये. तर कमी गुण मिळाल्यास पालकांनी खचून न जाता, मुलाच्या आतापर्यंत दिसलेल्या चांगल्या गुणांवर विश्वास ठेवून पुढील अभ्यासक्रम निवडताना समजूतदारपणा दाखवावा. आपण पालक म्हणून आपल्या पाल्यात जी चांगली मूल्यं, कौशल्यं, जिज्ञासा, मेहनतीची वृत्ती, सहकार्यशीलता आजवर बघितली आहे, त्याचा आधार घेत पुढे वाटचाल करावी.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) आपल्याला एक नवी दिशा देते. पण ही दिशा प्रत्यक्षात नवी नाही, तर आपल्या प्राचीन शिक्षण तत्त्वज्ञानाच्याच पुनःप्रस्तावनेची वाटचाल आहे. NEP 2020 ने सतत आणि सर्वांगीण मूल्यांकन, ३६० डिग्री मूल्यांकन, जीवन कौशल्यांचे मूल्यांकन, फॉर्मेटिव्ह अॅसेसमेंट, तंत्रज्ञान आधारित मूल्यांकन, बोर्ड परीक्षेचा विद्यार्थी आणि पालकांवर असलेला ताण कमी व्हावा अशा विविध नव्या दृष्टीकोनांचा समावेश केला आहे. यात केवळ परीक्षेच्या दिवशी लिहिलेल्या उत्तरपत्रिकेवर मुलाच्या यशाचा निकाल दिला जाणार नाही, तर वर्षभराच्या उपक्रमांतून, आंतरक्रियात्मक शिक्षणातून, स्वयं-अभ्यासातून आणि वैयक्तिक प्रगतीच्या अभिप्रायातून विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाचे समग्र चित्र उभे राहणार आहे.
या प्रक्रियेत फक्त शिक्षकच नव्हे, तर पालक, विद्यार्थी, शाळा व महाविद्यालयीन प्रशासक आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्र सहभागी व्हायला हवे. आपण जर खरंच NEP 2020 मधील मूल्यांकनाचे धोरण केवळ एका अधिकृत कागदावरच बघणार असू आणि आपल्या आचरणात, वर्गखोलीत आणि कुटुंबांमध्ये ते उतरणार नसेल, तर ती धोरणाची अपयशाची बाब नसेल, ती आपलीच चूक ठरेल. शिक्षण धोरणे दिशा देतात, पण त्या दिशेने चालणारी पावलं मात्र शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनीच उचलायची असतात.
शिक्षकांनी केवळ पाठांतरावर आधारित प्रश्नपत्रिका तयार करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विचार करणारी मूल्यांकन प्रक्रिया तयार करायला हवी. पालकांनी आपल्या मुलाच्या टक्केवारीकडे पाहण्याच्या मनोवृत्तीमध्ये बदल घडवायला हवा. स्वत: मुलांनीही केवळ गुण मिळवण्याच्या ध्येयाने नव्हे तर काय शिकतो आहे, किती बदलतो आहे, कोणत्या जीवनकौशल्यांचा विकास होतो आहे याकडे लक्ष द्यायला हवे.
आपण शिक्षण प्रक्रियेत ‘मूल्यमापन’ या शब्दाचा अर्थ फक्त टक्केवारीच्या आकड्यांमध्येच पाहणार का? की आपल्याला, आपल्या मुलांच्या सर्वांगीण वाढीचं, समग्र व्यक्तिमत्वाचा विकास मोजण्याचं आणि समजून घेण्याचं प्रयत्नशील असणं पसंत आहे?
एक उदाहरण म्हणून सांगता येईल की पिंपरी-चिंचवड येथील पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या ‘पुनरुत्थान गुरुकुलम्’ मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षाअखेरीस जवळपास ४० पानांची गुणपत्रिका दिली जाते. या गुणपत्रिकेत विद्यार्थ्याच्या अभ्यासाच्या गुणवत्तेपेक्षा अधिक भर दिला जातो, तो त्याच्या जीवनमूल्यांवर, व्यक्तिमत्व विकासावर, सामाजिक जाणिवांवर आणि समजुतदारपणावर. अशाच प्रकारच्या व्यापक, समग्र मूल्यांकन पद्धतीचा अवलंब आज आपल्याला सगळीकडे हवा आहे.
आजच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला हा विचार नक्कीच करायला हवा आणि तो केवळ पालकांनी नव्हे, शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी आणि संपूर्ण समाजाने केला तरच आपलं शिक्षण खऱ्या अर्थाने माणूस घडवणाऱ्या दिशेने वाटचाल करेल. जर खरंच आपण विकसित भारताचं स्वप्न पाहतोय, तर केवळ सरकारच्या धोरणांकडे बोट दाखवून थांबून चालणार नाही. आपापल्या परीने प्रत्येक शिक्षकाने, पालकाने आणि समाजाने मूल्यांकनाकडे नव्या नजरेने पाहिलं पाहिजे. जेणेकरून शिक्षण प्रक्रियेतून माणूस मुक्त होईल, समृद्ध होईल आणि सशक्त होईल. हेच तर आपलं खऱ्या अर्थाने शिक्षणदर्शन असावं, नाही का?
डॉ. गणेश अंकुश चव्हाण (प्राचार्य, एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स, पुणे)
gachavan@gmail.com