ईदचा मुहूर्त साधून काश्मीरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. तसा हा नेहमीचाच तणावग्रस्त भाग. बर्फ जमा होण्यापूर्वी आणि बर्फ वितळल्यानंतर अशा दोन मोसमांत काश्मीरमधील नियंत्रण रेषा गोळीबाराच्या आवाजाने दुमदुमतेच. उभय देशांत २००३ मध्ये शस्त्रसंधी झाला पण तो कागदावरच. त्याचे उल्लंघन ही नित्याची बाब होती. आताही तेच सुरू आहे. फरक एवढाच, की २००३ नंतर या वेळी प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर गोळीबार आणि तोफांचा मारा होत आहे. त्यात आतापर्यंत पाच भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. मोदी यांच्या शपथविधीला पाकिस्तानचे अध्यक्ष नवाझ शरीफ यांना प्रेमाचे आमंत्रण देण्यात आले होते. ते आले. मोदींनी त्यांच्या मातोश्रींना साडी वगैरे भेट दिली. त्यांनीही त्याची कृतज्ञ परतफेड केली. असे सर्व गोडगोड वातावरण असल्याने भारत-पाक संबंधांतही गोडवा येईल असा भाबडा समज अनेकांनी करून घेतला होता. मोदींचे समर्थ सरकार आल्याने पाकिस्तानी लष्कराची कुरापती काढण्याची हिंमत होणार नाही, असेही अनेकांना वाटले होते. पण तसे झाले नाही. तिकडे भुट्टोपुत्र बिलावल यांना भारतद्वेषाची उबळ आली. काश्मीरची इंच न् इंच भूमी परत मिळवू अशा वल्गना त्यांनी केल्या. इम्रान खान यांच्या आंदोलनामुळे शरीफ सरकार अडचणीत आले होते. त्यांनाही मग काश्मीरची आठवण आली आणि परवा संयुक्त राष्ट्रांत त्यांनी तो मुद्दा उकरून काढला. हे सुरू असताना आणि पंतप्रधान मोदींच्या जपान, अमेरिका दौऱ्यांनी भारतवासी भारावलेले असताना तिकडे सीमेवर गोळीबार सुरूच होता. एकटय़ा ऑक्टोबरमध्ये पाकने तब्बल ११ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्या प्रत्येक वेळी केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला मुँहतोड जवाब देण्यास भारत समर्थ असल्याचे सांगितले. या वेळीही रुग्णालयातून त्यांनी तेच सांगितले. असे इशारे काँग्रेसने दिल्यानंतर त्यावर कुत्सित हसण्याची एक प्रथा येथील अतिराष्ट्रवाद्यांत होती. त्यांना आता विनोद सुचतात की नाही ते लवकरच समजेल. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी, भारतात आता यूपीएचे सरकार नाही, याची आठवण पाकिस्तानला करून दिली. हा त्या कुत्सितपणाचाच एक भाग. पण मग, पाकिस्तानच्या गोळीबारात आमचे नागरिक मरत आहेत आणि आमचे पंतप्रधान इकडे प्रचारसभा घेत फिरत आहेत, या राज ठाकरे यांच्या तशाच प्रकारच्या टीकेला ते काय उत्तर देणार? मुळात हा पक्षीय राजकारणाचा विषय नाही, याचे भान सर्वानीच ठेवले पाहिजे. काँग्रेस सरकार पाकिस्तानला कुर्निसात करीत होते आणि मोदी सरकार मुठी वळवून दाखवत आहे, असे चित्र उभे करणे अवघड नाही, पण त्याला सत्य म्हणता येणार नाही. खरे तर दोन देशांदरम्यानच्या अशा चकमकींकडे एवढय़ा बाळबोधपणे केवळ बावळटच पाहू शकतात. पाकिस्तानने कुरापती काढल्या, गोळीबार केला, त्यात आपले पाच नागरिक मृत्युमुखी पडले अशा बातम्यांनी आपल्याकडील वर्तमानपत्रे भरली असताना तिकडे पाकिस्तानातही तशाच बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. फरक एवढाच, की त्यात कुरापतखोर भारत आहे आणि चार पाकिस्तान्यांचा मृत्यू झाला तो भारतीय गोळ्यांनी असे म्हटले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताला कडक इशारा दिल्याच्या बातम्याही तेथे प्रसिद्ध झाल्या आहेत. याचा काय अर्थ लावायचा? अशा चकमकींमुळे निर्माण होणारा तणाव पाकिस्तानी राज्यकर्त्यांना नेहमीच फायद्याचा असतो. भारतातही राष्ट्रवादी भावना पेटविण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. त्यातून केवळ राजकीय फायदे साधले जातात. हा तणाव भडकू न देण्यातच खरे राष्ट्रहित असते. आणि त्याचा मार्ग मुत्सद्देगिरीच्या अंगाने जातो. तेथे इशाऱ्यांचे वायबारच उपयुक्त ठरतात. त्यांना हसण्याचे कारण नसते.