५८ ते ६० वयोगटातील रुग्णांची संख्या अधिक

ठाणे – जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णांची संख्या जरी घटत असली तरी मृत्यूंमध्ये मात्र काही अंशी वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात मागील वीस दिवसांच्या कालावधीत करोनामुळे १६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृत पावलेले सर्व नागरिक हे सुमारे ६० वयोगटातील असून त्यांना सह्व्याधी असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गट आमने-सामने; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

हेही वाचा >>> ५०० ते हजार रुपयांत चिमुकल्या मुलांची वेठबिगारीसाठी खरेदी; ठाणे, पालघर जिल्ह्यातील चिमुकल्यांची नगरमधील मेंढपालाकडे वेठबिगारी

जिल्ह्यातील करोनाच्या रुग्णसंख्येत सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीपासूनच घट होण्यास सुरवात झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात प्रतिदिन २०० ते ३०० रुग्ण आढळून येत होते. यात घट होऊन सध्या जिल्ह्यात प्रतिदिन १०० ते १८० रुग्ण आढळून येत आहेत. तर मागील तीन दिवसांच्या कालावधीत यात अधिक घट होऊन जिल्ह्यात दररोज आढळून येणाऱ्या करोना बाधित रुग्णांची संख्या ही ५० ते ७० इतकी झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील करोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. असे असले तरी मागील तीन आठवड्यांच्या कालावधीत जिल्ह्यात १६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या सर्व नागरिकांचा वयोगट हा ६० असून यातील बहुतांश नागरिक हे मधुमेह, कर्करोग, दमा यांसारख्या आजारांनी ग्रासले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही ७३१ इतकी आहे. यातील ६८३ रुग्णांवर घरीच उपचार केले जात असून ४८ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी नऊ रुग्ण हे प्राणवायू यंत्रणेवर आहेत तर चार रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत.

हेही वाचा >>> जलस्त्रोत काठोकाठ; बारवी, आंध्रा धरण भरले, जिल्ह्याची पाणीचिंता मिटली

मागील वीस दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात करोनामुळे १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ठाणे महापालिका क्षेत्रात सहा, मिरा भाईंदर पाच, कल्याण दोन, उल्हासनगर दोन आणि नवी मुंबई पालिका क्षेत्रात एका रुग्णाचा समावेश आहे. मृत पावलेले हे सर्व नागरिक ५८ ते ६० वयोगटातील आहेत. या रुग्णांना मधुमेह, दमा, कर्करोग, क्षयरोग यांसारख्या सह्व्याधी देखील असल्याचे उपचारादरम्यान समोर आले आहे. सध्या करोनाची तीव्रता कमी आहे मात्र डेंग्यू, मलेरिया तसेच साथीच्या आजरांची लागण झालेल्या रुग्णांची खबरदारी म्हणून करोनाची चाचणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी दिली आहे.