ठाणे – केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ठाणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी गेल्या अडीच वर्षात ८० हजार कोटींपेक्षा अधिकचे प्रकल्प मंजूर केले. त्यामुळं येत्या दहा वर्षात ठाणे केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातला आदर्श जिल्हा होणार आहे. ठाणे जिल्ह्याचे देशाच्या अर्थव्यवस्थेतले योगदान ४८ बिलियन डॉलरचे असून ते २०२३० पर्यंत ते १५० बिलियन डॉलर इतके करायचं आहे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
तर एमएमआरच्या विकासासाठी एमएमआरडीए आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सामंज्यस करार झाला आहे. मुंबईचा जीडीपी दुप्पट होणार असून मुंबई एवढेच पालघर, ठाणे आणि रायगडचंही देशाच्या विकासात योगदान असणार आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजवंदन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे शहरातील पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
देशात आज महाराष्ट्र अनेक आघाड्यांवर क्रमांक एक वर आहे. महाराष्ट्रानं आर्थिक, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रात मुसंडी मारली. देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. महाराष्ट्राच्या विकासात मुंबईचं मोठं योगदान आहे. पण, मुंबई म्हणजे केवळ मुंबई नाही तर मुंबईपासून ठाणे आणि पुढे रायगडपर्यंत सगळं महानगर क्षेत्र सुद्धा यामध्ये येतं. ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला यापूर्वीच्या काळात ठाण्यासाठी भरीव काम करण्याची मोठी संधी मिळाली. ठाणे हे माझे घर आहे. या जिल्ह्याशी माझा एक ऋणानुबंध आहे. त्यामुळे या जिल्ह्यासाठी विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या. ठाणे हे विकासाचं खणखणीत नाणं आहे, हे दाखवून दिलं. असल्याचे ही मत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. तर ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काही आव्हानं सुद्धा दिसतात. जिल्ह्यातल्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी काळू धरण कालमर्यादेत पूर्ण करावे, असे निर्देश दिली असल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.
पुनर्वसन, परवडणारी घरे, जागतिक दर्जाची वाहतूक यंत्रणा, आणि दर्जेदार जीवनशैली असा ठाणे जिल्ह्याचा चौफेर विकास करायचाय. देशातले सगळ्यात मोठे विकासात्मक बदल झालेला जिल्हा म्हणून देशात आघाडी मिळवून देण्याचं स्वप्न मी पाहिलं आहे. आपलं सरकार ते कोणत्याही परिस्थितीत साकार करणार आहे. ठाण्याचा चेहरा मोहरा बदलणारे तब्बल ३४ पायाभूत विकास प्रकल्प सुरू आहेत. मेट्रो, बुलेट ट्रेन, कोस्टल, उड्डाणपूल समावेश आहे, त्यासाठी तब्बल ४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. नागला बंदर येथे सर्वात मोठी चौपाटी विकसित झाली आहे. ठाणेकरांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी, मनोरंजनासाठी ही मोठी सुविधा विकसित झाली आहे. असे शिंदे यांनी सांगितले. तर गृहनिर्माण, नगर विकास यासारखी महत्त्वाची खाती माझ्याकडे आहेत. येत्या पाच वर्षात आठ लाखापेक्षा जास्त घरं बांधणार आहोत. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पाही जवळजवळ पूर्ण झाला आहे. ठाणे जिल्हा तर उद्योगांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षी ठाणे जिल्हा उद्योग केंद्राने गेल्या दोन वर्षात १० हजार ६१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह १५० सामंजस्य करार केले. त्यातून एक लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. ठाणे शहराला ३२ कि.मी. चा सागरी किनारा असून, ११.९० कि. मी. सागरी किनारा विकासाचे नियोजन केले आहे. त्यातही, ५.३० कि. मी. चा प्रकल्प पूर्ण झाला आहे. १४ हजार क्षमतेचं भव्य असे कन्वेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. दिव्यांग बंधू भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणेसाठी सीएसआरच्या माध्यमातून दिव्यांग कल्याण केंद्र उभारले आहे.
पहलगाममधल्या अतिरेक्यांनी निरपराध, पर्यटकांना गोळ्या घातल्या. याचा बदला मोदीजी आणि आपले शूर सैनिक घेतीलच. त्या कामात मराठी पाऊलही पुढे असेल. अशी स्पष्टोक्ती एकनाथ शिंदे यांनी दिली. तर जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने बुधवारी घेतला. यामुळे मोदी सरकारची सामाजिक न्यायाची भेटच देशाला मिळाली असेही शिंदे यांनी यावेळी मत व्यक्त केले.