संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊर भागातील तसेच श्रीनगर भागातील आदिवासी पाड्यावरील बांधवांना परिसरातच आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून ठाणे महापालिकेने फिरते आरोग्य केंद्र सुरु केले असून त्याचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांच्या प्राथमिक आरोग्य सुविधेसह विविध तपासण्या, उपचार आणि लसीकरण करण्यात येणार आहे. या शिवाय, अपघात झाल्यास किंवा सर्प दंश झालेल्या व्यक्तीवरही याठिकाणी उपचार करण्यात येणार आहे. आठवड्यातील ठरवून दिलेल्या दिवशी या केंद्राचे वाहन संबंधित पाड्यावर जाऊन विनामुल्य आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

हेही वाचा – तोतया कल्याण डोंबिवली पालिका अधिकाऱ्याला उल्हासनगरमधून अटक ; ठाकुर्लीत ज्येष्ठ नागरकाची केली होती लूट

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २६ लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यापैकी ५२ टक्के नागरिक हे झोपडी आणि चाळीमध्ये राहतात. आरोग्य निकषांनुसार प्रत्येक ३० ते ४० हजार लोकसंख्येसाठी एक आरोग्य केंद्र असणे आवश्यक आहे. परंतु ठाण्यात एक ते दीड लाख लोकसंख्येचा भार एका आरोग्य केंद्रावर पडतो. ठाण्यातील विद्यमान २७ आरोग्य केंद्रांवरील ताण कमी करण्यासाठी महापालिकेने शहरात ५० ठिकाणी आपला दवाखाना उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पालिकेने ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या योजनेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी दवाखाने सुरु केले आहेत. त्या माध्यमातून नागरिकांना विनामुल्य आरोग्य सुविधा मिळत आहे. असे असले तरी शहरातील आदिवासी पाड्यांवर अशी आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना शहरात यावे लागते. काही वेळेस तात्काळ आरोग्य सुविधा न मिळाल्याने नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे उपायुक्त मनीष जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याठिकाणी फिरते आरोग्य केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेऊन त्याचे शुक्रवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण केले.

हेही वाचा – कल्याण : गणेशोत्सवात मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या पोलिसांच्या सूचना

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊर परिसर हा ठाणे महापालिकेच्या हद्दीत येत असून याठिकाणी १८ आदिवासी पाडे आहेत. त्यामध्ये येऊर गाव, एअर फोर्स, भेंडीपाडा, रोणाचा पाडा, नारळीपाडा, आश्रम परिसर, पाटोणापाडा, जांभूळपाडा, वणीचा पाडा, पाचवडपाडा, बोरुवडेपाडा, देवीचा पाडा, टक्कर पाडा, पानखंडा, बामनोलीपाडा, नवापाडा, कशेळीपाडा, अवचितपाडा या पाड्यांचा समावेश आहे. याशिवाय, ठाणे शहरातील श्रीनगर भागातही कैलासपाडा आणि जुना गाव असे दोन आदिवासी पाडे आहेत. येऊर आणि श्रीनगर भागातील एकूण २० आदिवासी पाड्यांवर २ हजार ९८८ घरे असून येथील लोकसंख्या १२ हजार ९४९ इतकी आहे. याठिकाणी पालिकेचे फिरते आरोग्य केंद्राचे जाऊन आरोग्य सुविधा देणार आहे. कोणत्या पाड्यांवर कोणत्या दिवशी आरोग्य केंद्राचे वाहन येणार, याचे नियोजन पालिकेने आखले असून त्यानुसार या वाहनाद्वारे सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० या वेळेत पाड्यांवर आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा मिळणार आरोग्य सुविधा
प्राथमिक आरोग्य तपासणी, गरोदर मातांची तपासणी, लहान मुलांचे लसीकरण, जखम झाली असल्यास मलमपट्टी करणे, सर्प दंश झाल्यास प्राथमिक उपचार करणे तसेच इतर आरोग्य तपासण्या आणि उपचाराची सुविधा फिरते आरोग्य केंद्राद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे. हे केंद्र वातानुकूलीत असणार आहे. या वाहनांमध्ये वेंटीलेटरचीही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीवर प्राथमिक उपचार करून त्याला रुग्णालयात दाखल करणे शक्य होणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.